नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्याची तुलना बंदिस्त ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावलेल्या निजामुद्दीन मकरजसोबत केली जाऊ नये असे म्हटले आहे. कुंभमेळ्याला हजेरी लावणारे भक्त बाहेरचे नसून आपले लोक आहेत असा युक्तिवाद त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली. तसेच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचेही ते म्हणाले आहेत. लोकांचे आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
तिरथ सिंह रावत यांना कुंभ आणि निजामुद्दीन मकरजची तुलना का केली जाऊ नये असे विचारण्यात आले होते. कारण कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याची भीती आहे. यावर त्यांनी सांगितले की, “कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये. मकरजचा कार्यक्रम एका बंदिस्त ठिकाणी पार पडला होता. पण कुंभ एका मोकळ्या ठिकाणी गंगेच्या किनारी पार पडत आहे,” असे तिरथ सिंह रावत यांनी सांगितले आहे.
तिरथ सिंह रावत यांनी यावेळी कुंभमेळा १२ वर्षातून एकदा पार पडत असून हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेशी जोडलेला विषय असल्याचे सांगितले. “करोना संकटाचं आव्हान असताना सर्व नियमांचं पालन करत यशस्वीपणे कुंभमेळा पार पाडणं आमचं ध्येय आहे,” असे ते म्हणाले आहेत.
कुंभमेळा आणि मकरजमधील फरक अधोरेखित करताना तिरथ सिंह रावत यांनी कुंभसाठी हजेरी लावणारे भक्त हे बाहेरचे नसून आपले लोक आहेत असे म्हटले. “मकरजचा कार्यक्रम पार पडला तेव्हा करोनासंबंधी इतकी जागरुकता नव्हती किंवा कोणतीही नियमावली नव्हती. कार्यक्रमासाठी हजेरी लावणारे किती काळ तिथे वास्तव्यास होते याची कोणालाही कल्पना नाही,” असे यावेळी त्यांनी सांगितले. पण आता करोनाबद्दल जागरुकता असून त्यासंबंधी नियमावलीदेखील आहे असे ते म्हणाले.