शिंदे वासुली (वार्ताहर) – भामासाखेड धरणप्रकल्पग्रस्तांनी गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत कुटुंबासह पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. पुण्याला पाणी नेण्यासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनचे एक किलोमीटरचे काम बंद करा अन् 100 टक्के पुनर्वसन करा मगच काम सुरू करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलन चिघळत असल्याचे पाहून जिल्हाधिकार्यांनी आज आंदोलकांसमवेत राजगुरूनगर येथे बैठक घेतली. तब्बल अडीच तास खलबत झाल्यानंतर प्रशासनाने काम थांबविण्याचा निर्णय घेतला व शेतकर्यांशी चर्चाकरून आठ दिवसांत पुनर्वसनाच्या कार्यवाहिचा प्रश्न तडीस लावणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आंदोलनकांना दिल्यानंतर प्रश्नासन आणि आंदोलकांमध्ये समेट घडले असून जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे आंदोलकप्रमुख सत्यवान नवले यांनी सांगितले.