चाकण, (वार्ताहर) – गेल्या 20 ते 22 दिवसांपासून शिरूर व दौंड तालुक्यासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून दररोज एक हजार क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत घटली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणाच्या पश्चिम भागात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
साधारणपणे धरणात दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी 50 टक्के पाणीसाठा शिल्लक रहातो, असा अंदाज धरण परिसरातील नागरिकांना असतो. पण यावर्षी धरणाच्या पश्चिम भागातील गावांतील नागरिकांचा अंदाज चुकल्याने उन्हाळी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
गतवर्षी सुमारे 50 टक्के पाणीसाठा भामा आसखेड धरणात होता, त्यामुळे सुमारे 25 ते 30 किलोमीटरपर्यंत धरणाच्या पश्चिम भागातील नदीपात्रालगतच्या गावातून फुगवाट्याचे पाणी होते; परंतु यंदा विसर्ग सातत्याने सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी झाली. बाधित शेतकरीच अडचणीत आले तर काही धरणलगातचे धरण बाधित गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करीत आहेत .
खेड तालुक्यातील भामा आसखेड हे 8.14 टीएमसीचे मातीचे धरण आहे. परंतु त्याचा फायदा खेडपेक्षा शिरूर आणि दौंड तालुक्यालाच जास्त होतो. आणि धरण ग्रस्त, बाधित शेतकरी जमिनी देऊन, बेघर होऊनही सगळ्या सुविधांपासून कायम वंचितच राहिले आहेत आणि त्या शेतकर्यांचे गार्हाणे शासन दरबारी अदयापही प्रलंबीत असून या समस्यावर लवकर तोडगा निघावा असे मत बाधित शेतकर्यांनी व्यक्त केले.
भामा आसखेड धरण हे चाकण औद्योगिक वसाहत, पुणे, पिंपरी चिंचवड, आळंदी या शहरांसाठी महत्वाचे आहे. परंतु खेड तालुक्यातील चाकण शहर आणि औद्योगिक वसाहतीला मे महिन्याच्या अखेरीस पर्यँत पाणी पुरेल का ? असे चिंतचे वातावरण नागरिकांत आहे. कारण सध्या धरणात फक्त 31 टक्के पाणी साठा आहे.
विहिरींनी गाठला तळ
पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पश्चिम भागातील नागरिकांना मे महिन्याच्या मध्यात भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या भागातील कोळीये, गडद, गाबरवाडी, आंभु, वांद्रा, वेल्हावळे आदी गावात नदीपात्र कोरडे पडले आहे तसेच काही गावांत पिण्यासाठी अल्पसे पाणी असून वापरासाठी पाणी शिल्लक नसल्याने जनावरांचे हाल होत आहे.
31.69 टक्के साठा
भामा आसखेड धरणात सध्या एकूण साठा 82.320 दलघमी (2.90 टीएमसी), उपयुक्त साठा 68.798 दलघमी (2.43 टीएमसी) इतका साठा आहे परंतु दि 21 मार्च पासून आजतागायत (सुमारे 22 दिवस) 1 हजार क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे आज अखेर धरणात फक्त 31.69 टक्के पाणीसाठा आहे.