दि. 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती स्व . डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत आहे.
डॉ. एपीजे यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर आणि चतु:रस्र होते. जीवनाची दिशा बदलून जाईल इतके प्रचंड सामर्थ्य या व्यक्तिमत्त्वात आहे. एक अभ्यासू संशोधक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास म्हणजे स्वकर्तृत्वाची महान यशोगाथा आहे.
पुस्तकांच्या माध्यमातून चांगले विचार मिळतात, आचरणाची कर्तव्यबुद्धी प्राप्त होते. पुस्तक, ग्रंथ, यांच्या वाचनाने जीवनात कुठेच कटुता निर्माण होत नाही. कसं वाचाव, किती वाचावं, कुठे वाचावं, काय वाचावं, त्याचा आपल्याला काय लाभ होणार, समाजाला काय होणार, कुटुंबाला काय होणार हा विचार निरर्थक आहे. अर्थ आहे तो वाचनातील संस्कारांना आणि जगण्यातील संस्कृतीला!
वाचनवेडे होण्यासाठी ध्यास आणि ध्येयवेडा वाचक महत्त्वाचा आहे. वेळ काढा आणि पुस्तके वाचा हाच संदेश डॉ. एपीजे यांनी आपणास सातत्याने दिला आहे. जीवन सुस्थिर करणेकामी, जीवनात आदर्श व प्रसन्नता निर्माण होणेकामी आपण वाचनाचे प्रयत्न करावेत हा विचार म्हणजेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली होय. चौफेर वाचनाने रोज एखादा नवा विचार, कल्पना किंवा विषयांचे भावविश्व प्रत्येकाच्या अंतःकरणात तयार होते. या स्वगत मनाच्या आंदोलनांना साहित्य आणि विज्ञानात प्रकट करताना हृदयस्थ विचारांचा अभिषेक पूर्णत्वास जातो इतकी प्रचंड शक्ती वाचनात आहे.
लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेले “गीतारहस्य’ आपल्याला दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “माझी जन्मठेप’ अत्यंत हृदयस्थ भावनेने रेखाटले. नेहरूंचे “डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, गांधीजींचे “सत्याचे प्रयोग’, बाबासाहेबांचे “भारतीय संविधान’, “ज्ञानेश्वरी’, गाथा, रामायण, महाभारत, गीता, उपनिषदे, वेदांत सूत्रे… अलीकडच्या काळात मृत्युंजय, छावा, स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अमृतवेल, एक होता कॉर्व्हर, अशी कित्येक महत्त्वपूर्ण पुस्तके आपल्या जीवनाला कलाटणी देणारी आहेत. त्याचं एखादे तरी पान आपण वाचूया..
ग्रंथ हा अडीच अक्षरांचा शब्द, पुस्तक हा साडेतीन अक्षरांचा शब्द, साऱ्या विश्वाचे ज्ञान, जिज्ञासा, माहिती, संस्कार आणि संस्कृती या पुस्तकांमध्ये असते. नोव्होने असे म्हटले आहे की जुना कोट घाला पण नवीन पुस्तके विकत घ्या. नवीन पुस्तके विकत घेण्यात बंगाल आणि केरळचा नंबर लागतो. आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांतही ही चळवळ अग्रभागी आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अपेक्षित मानवतेचा, राष्ट्रप्रेमाचा विचार रोजच्या वाचनाने करूया. एक वेगळी पहाट, मानवता निर्माण करणारा संदेश वाचन प्रेरणादिना निमित्ताने स्वीकारून पुढे जाऊया…
– रामदास थिटे