सातारा – स्वराज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती, याशिवाय रस्ता अरुद असल्याने किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसह सातारकरांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता अजिंक्याताऱ्यावर पोहोचणे सुखकर होणार आहे, कारण प्रशासनाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच रस्त्याचे कॉंक्रिटीकरण युद्धपातळीवर सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तिसरी राजधारी आणि सातारा शहरातील एैतिहासिक घटनांचा साक्षीदार, दक्षिण बाजूला भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला हा पर्यटकांसह समस्त सातारकरांसाठी आत्मियतेचा आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या किल्ल्याचे सौंदर्य नजरेत भरल्याशिवाय रहात नाही.
या किल्ल्यावर पोलीस वायरलेस स्टेशन आणि दूरदर्शन केंद्र, तसेच काही ऐतिहासिक विहिरी, श्री मंगळाई देवी आणि काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या होत्या. परंतु किल्ल्यावर ये- जा करण्यासाठी असलेला अरुंद रस्ता काही वर्षांपुर्वी विकसित झाला. त्यानंतर अनेक पावसाळे झेलून त्याची दुरवस्था झाली होती.
त्यामुळे हा विषय नेहमीच चर्चेत असायचा. त्यानंतर आता मात्र पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हाच रस्ता संरक्षक भिंतीसह सिमेंटचा बनवण्याचे काम अगदी अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या किल्ल्यावर पोहचणे आता सुखकर होणार आहे. सातारा नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या या कामासाठी खासदार उदयनराजे भोसले यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन मिळत असल्यामुळे हे काम सातारकरांना आकर्षित करेल, हे निश्चित. सातारा येथील देसाई कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या वतीने हे काम वेगाने सुरू आहे.