मुंबई – एक महिन्यापासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीवर आणि जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. भारताच्या रुपयाचे मूल्य अस्थिर झाले असून शेअर बाजारातही अस्थिरता कायम आहे. या युद्धामुळे काय परिणाम होतील या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाने काल चर्चा केली.
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बंगळुरू येथे झाली. असल्याचे रिझर्व बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की युद्धामुळे कच्च्या तेलासह विविध वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्याचबरोबर जागतिक पातळीवर चलनवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेने यावेळी चर्चा केली असे सांगण्यात आले.
गेल्याच आठवड्यामध्ये रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकात दास यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीत बोलताना भारत या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसा सज्ज असल्याचे सांगितले आहे. भारत पर्यायी मार्गाने क्रुड उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्याचबरोबर भारतातील बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता विक्रमी पातळीवर कमी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये खासगी क्षेत्राला भांडवल पुरवठा करण्यासाठी बॅंका तयार असल्याचे दास यांनी सांगितले होते. रुपयाचे मूल्य काही प्रमाणात कमी झाले असले तरी भारताकडे 630 अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलनाचा साठा आहे. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यामध्ये भारताला या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे दास यांनी सांगितले होते.
करोनाची परिस्थितीने निवळत असतानाच युद्ध सुरू झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपेक्षित आहे. मात्र हा परिणाम केवळ भारतावरच नाही तर सर्व जगावर होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे.