मुंबई – माझी प्रतिमा खराब करण्याचे काम किरीट सोमय्या करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि अनिल परबांच्या मालकीचे आहे, असा आरोप सोमय्या सतत करत आहेत. त्या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र शिवसेनेकडूनही सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दरम्यान, हे रिसॉर्ट माझे नाही. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. असे परब यांनी म्हटले आहे. तसेच सोमय्या वातावरण खराब करत आहेत. सोमय्या यांच्यामुळे जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे, असेही परबांनी सांगितले आहे.
आपण सोमय्यांच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, असा इशाराही परबांनी दिला आहे. तसेच किरीट सोमय्या रिसॉर्ट तोडायला कर्मचारी आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. हिंमत असेल तर तोडून दाखवा, असे खुले आव्हान त्यानी सोमय्यांना दिले आहे. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भंग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. परब यांचे मुद्दाम नाव घेऊन वातवरण खराब करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत. त्यांच्यावर पण कारवाई करावी, असे म्हणत त्यांनी मालवणमधील नारायण राणे यांच्या बंगल्याकडेही नाव न घेता इशारा केला आहे. तसेच गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू असे सांगितले, पण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना, असेही परबांनी यावेळी बाजवले आहे. राष्ट्रवादीचा इशारा झुगारून सोमय्या कोकणात पोहोचले. मात्र कशेडी घाटात त्यांना पोलिसांनी अडवले आणि नोटीस घेण्यास सांगितले. मात्र यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद झल्याचे दिसून आले.