Rasta Roko : मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय मान्य केला नसून ओबीसीतून आरक्षणासाठी ते आग्रही आहेत. सगेसोयरे अधिसूचनेच्या तत्काल अंमलबजावणीचाही आग्रह धरला आहे. जरांगे यांनी आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करत 24 फेब्रुवारीपासून ठरावीक वेळेत गावागावात रास्तारोको करण्याचे आवाहन केले होते. त्या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
आज शनिवारी (दि. 24) मराठा समाजाच्या रास्तारोको आंदोलनाच्या पहिल्या दिवशी बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात नवरदेव रस्त्यावर उतरला होता तर नांदेड जिल्ह्यात तरुणाने दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
नवरेवासह वऱ्हाडी मंडळी रास्ता रोकोत सहभागी –
वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडी मंडळीसह कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे लग्नासाठी चालले होते. मात्र औराळा फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरू असल्याने नवरदेवाची गाडी थांबली. या ठिकाणी नवरदेवासह ववऱ्हाडी मंडळी देखील या रास्तारोको आंदोलनात अर्धा तास सहभागी झाले होते. नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींनी आंदोलन कर्त्यांना विनंती केली. त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी फक्त नवरदेवाची गाडी सोडली. वऱ्हाडी मंडळी आंदोलन संपल्यानंतर विवाहस्थळाकडे रवाना झाले.
तसेच कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर या गावासह सर्कलच्या शेकडो सकल मराठा समाजाच्यावतीने कन्नड-वैजापुर या मुख्य राज्य मार्गावर शनिवारी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत तब्बल 2 रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या.
नांदेडमध्ये तरुणाने पेटवली दुचाकी –
जिल्ह्यातील उस्माननगर रोडवरील लोंढे सांगवी येथे एका मराठा आंदोलकाने स्वतःची दुचाकी पेटवून सरकारचा निषेध केला. शिवहार पाटील लोंढे असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी स्वतःहून उस्माननगर रोडवर मध्यभागी आपली दुचाकी उभी करून पेटवून दिली. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोंढे सांगवी फाटा उस्मान नगर येथे मराठा आंदोलक शिवहार पाटील लोंढे यांनी आपली दुचाकी पेटवून देऊन सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरातील हर्सूल टी पॉइंट, जाधववाडी चौक, सिडको, पुंडलिकनगर, गजानन मंदिर चौक अशा विविध भागात रस्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोमुळे शहरभरात वाहतूक विस्कळित झाली. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. सकाळी 10 वाजेपासून सदर आंदोलन सुरू झाले होते.
बीड जिल्ह्यातील परळीत रास्ता रोको केला. यावेळी रास्ता रोको आंदोलनात लहान मुले व महिलाही सहभागी झाल्या होत्या. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे.
शिक्रापूर -चाकण रस्त्यावर रास्तारोको
शिक्रापूर चाकण रस्त्यावर वाजेवाडी तसेच केंदूर ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रास्तारोको आंदोलन करत महामार्ग रोखण्यात आला. दरम्यान सकल मराठा समाजाने चाकण शिक्रापूर महामार्गावर ठिय्या मांडत एक मराठा लाख मराठा तसेच मनोज जरांगे आगे बढो या घोषणा देत सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी करत मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासनाकडे केली असून याबाबतचे निवेदन शिरुर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना दिले आहे.
नगरमध्ये चार ठिकाणी शांततेत रस्ता रोको; वाहनांच्या लागल्या रांगा –
सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरात चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन झाले. या आंदोलनांमुळे महामार्गांवरील काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. सकल मराठा समाजाच्या नगर शहरातील पदाधिकार्यांनी शनिवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गावरील राजमाता जिजाऊ चौकात (डेअरी चौक, शेंडी बायपास), भिंगारला वेशीजवळ (विजय लाईन चौक), केडगाव वेशीजवळ व शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महामार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. शेंडी व एमआयडीसी आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदारांनी येऊन निवेदन स्वीकारले तर अन्य दोन ठिकाणी स्थानिक अधिकारी आले होते.
भिंगार येथे सकल मराठा समाज भिंगारच्या वतीने विजय लाईन चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. मराठ्यांचा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दा व पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, तसेच मराठा आरक्षणात राहिलेल्या त्रुट्या दुरस्त कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्याने सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर १५ मिनिटांनी आंदोलने सुरू करण्यात आली. तसेच दुपारी १ वाजता पेपर संपणार असल्याने त्याआधीच पाऊण वाजता आंदोलन थांबवण्यात आले. एमआयडीसीच्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देऊन तातडीने विखे पाटील रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तसेच राज्यात विविध ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कोपरगावमध्ये वाहनांच्या लागल्या रांगा –
कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील साईबाबा कॉर्नर येथे नगर- मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यावेळी शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शासनाच्या विरोधात घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलकांनी महामार्गावर बसून ठिय्या मांडत भेळभत्ता खात रस्तावर चक्काजाम केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारी डीज ते तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.
बसस्थानक परिसरात रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा –
मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज टाकळीभान (नगर) येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर बसस्थानक परिसरात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंडळाधिकारी प्रशांत ओहळ यांना निवेदन देण्यात आल्यावर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्तारोकोमुळे श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
बेलवाडीत रास्ता रोको –
बारामती-इंदापूर रस्त्यावर पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे बारा वाजेपर्यंत चालले. या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. बेलवाडी येथील सकल मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे, मनोज जरांगे पाटील आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बारावी बोर्डाची परीक्षा डोळ्यासमोर ठेवून 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू करण्याचे आवाहन
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनादरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी थोडा बदल केला आहे. बारावी बोर्डाची परीक्षा डोळ्यासमोर ठेवून 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने जरंगाच्या आंदोलनावर भाष्य करताना म्हटले की, आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे, पण लोकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तर दुसरीकडे 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे.