अहमदाबाद – फलंदाज व गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर मुंबईने ओडीशाचा एक डाव 108 धावांनी निर्णायक विजय मिळवला. या सामन्यात मुंबईकडून अरमान जाफर, सर्फराज खान यांनी फलंदाजीत तर शम्स मुलाणीने गोलंदाजीत मोलाची कामगिरी करत संघाचा विजय साकार केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून ओडीशाने प्रथम फलंदाजी केली. शंतनू मिश्राच्या खेळीच्या जोरावर ओडीशाने आपल्या पहिल्या डावात 284 धावा उभारल्या. मात्र, त्यांच्या गोलंदाजांवर दडपण राखत मुंबईने 9 बाद 532 धावांवर पहिला डाव घोषित केला.
त्यात सर्फराज खानने 165 धावांची, तर अरमान जाफरने 125 धावांची खेळी केली. यानंतर ओडीशाचा दुसरा डावदेखील मुंबईच्या गोलंदाजीसमोर 140 धावांवर गडगडला व मुंबईने एक डाव आणि 108 धावांनी निर्णायक विजय मिळवला व आपली बाद फेरी गाठण्याची आशाही कायम राखली.
रहाणेचा पुन्हा फ्लॉप-शो
भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेला मुंबईचा तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे या सामन्यात साफ अपयशी ठरला. त्याला या सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही. या स्पर्धेत रहाणेने सलामीच्या सामन्यात शतक साकार केले होते. मात्र, त्यानंतर त्याला दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता त्याचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणे आणखी कठीण बनले आहे.
संक्षिप्त धावफलक – ओडीशा पहिला डाव – सर्वबाद 284 धावा. मुंबई पहिला डाव – 9 बाद 532 धाव घोषित. ओडीशा दुसरा डाव – 42 षटकांत सर्वबाद 140 धावा. (अभिषेक राऊत 59, शम्स मुलाणी 5-64).