Arvind kejriwal ayodhya – अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर निमंत्रण मिळालेच नाही. केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केजरीवाल म्हणाले की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे अखेर निमंत्रण मिळालेले नाही. मात्र मी 22 जानेवारीनंतर आई-वडील आणि पत्नीसह अयोध्येला जाणार आहे.
केजरीवाल म्हणाले की, मला श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पत्र मिळाले आहे. पण मला सांगण्यात आले की, प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी वैयक्तिक आमंत्रण देखील पाठवले जाईल, मात्र अद्याप ते मिळालेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव निमंत्रित व्यक्तीलाच तिथे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कारणास्तव मी 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाणार आहे.
दरम्यान, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना पाठवलेल्या समन्सवर ते म्हणाले की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच काम करू. कायद्यानुसार आम्ही पुढील पावले उचलू.
वृद्धांसाठी 86 गाड्या यात्रेसाठी पाठवल्या –
यावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आम्ही वृद्धांना तीर्थयात्रेला पाठवतो. आत्तापर्यंत आम्ही अशा 86 गाड्या पाठवल्या आहेत, ज्यामध्ये 82000 प्रवासी तीर्थयात्रेला गेले आहेत. जेव्हा 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यानंतर आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त गाड्या अयोध्येला पाठवायच्या आहेत. कारण लोकांमध्ये रामललाच्या दर्शनासाठी खूप उत्साह आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या राजकारणाशी संबंधित प्रश्नावर ते म्हणाले की, माझ्या मते मंदिर हा भावनेचा विषय आहे. प्रत्येकाची आपापल्या धर्मानुसार श्रद्धा असते. हा भावनेचा आणि भक्तीचा विषय आहे, त्यात राजकारण नसावे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे.