मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मताचा कोटा वाढवल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, या सर्व वृत्तावर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा निवडणूकीचे उमेदवार संजय राऊत यांनी माहिती दिली. महाविकास चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचे यावरी त्यांनी सांगितले.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाचे आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. आजच्या मतदानानंतर सगळ्यांनाच हे आकडे स्पष्ट दिसतील, असेही राऊत म्हणाले. तसेच राज्यसभा निवडणूकीच्या अगोदर काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले होते हे चूकीचे आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदरांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्यात एक दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असे राऊत म्हणाले.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी ईडीकडे विनंती अर्ज केला होता. मात्र, त्यांना अजून मतदानाची परवानगी देण्यात आली नाही. घटनेने या दोघांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.