मुंबई – आमचे तिन्ही उमेदवार हे महाराष्ट्रातील असून ते राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे, सदसदविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचे संकेत दिले.
भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिकांनी आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरले. यावेळी देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीकरिता आज भाजपतर्फे तीन उमेदवारांची उमेदवारी आम्ही दाखल केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जात आहेत. यासोबत डॉक्टर अनिल बोंडे हे कृषिमंत्री राहिलेले आहेत. ते जरी एमबीबीएस डॉक्टर असले तरी कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत.
याशिवाय मुन्नाजी महाडिक जे कोल्हापूरचे खासदार राहिले आहेत. सहकाराच्या क्षेत्रात प्रचंड मोठं स्थान आहे. ते आमचे तिसरे उमेदवार आहेत, अशा तीनही उमेदवारांचे फॉर्म आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे, आमचे तीनही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तीन लोक निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन, त्यांचे तीन, त्यांनी एक उमेदवार परत घेतला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.