मुंबई – 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. ही सुनावणी संपल्यानंतरच हे प्रकरण सीबीआयने गुजरात एटीएसकडून ताब्यात घेतले आहे. मुंबईत 1993मध्ये 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात हे चार आरोपी गेल्या 29 वर्षांपासून वॉन्टेड होते.
गेल्या 29 वर्षांपासून गुजरात एटीएस आणि सीबीआयचे पथक मुंबईतील सिरील बॉम्बस्फोटातील या चार आरोपींचा शोध घेत होते. गुजरात एटीएसने या चार आरोपींना गेल्या आठवड्यात अहमदाबादमधून अटक केली होती. या आरोपींची सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता हे प्रकरण गुजरात एटीएसने सीबीआयकडे वर्ग केले आहे.
दरम्यान, 29 वर्षे मुंबई बॉम्बस्फोटातील हे आरोपी कायद्यापासून दूर पळत होते, कदाचित आता पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला असावा, असे त्यांना वाटू लागले होते. पण गेल्या आठवड्यात गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या चौघांना अटक केली. या चार आरोपींच्या शोधात केवळ मुंबई पोलीस, सीबीआय किंवा गुजरात एटीएसच नाही तर जगातील अनेक सुरक्षा यंत्रणा या आरोपींचा शोध घेत होत्या. या चारही आरोपींविरुद्ध इंटरपोल आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.