दोनच दिवसांत येणार होते चासकमानचे पाणी : अज्ञातांवर गुन्हा दाखल
40 गाव पाणी योजनेचा ट्रान्सफॉर्मर फोडण्याचा प्रयत्न
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – चास कमान धरणातून केलेल्या नवीन 40 गाव योजनेचे पाणी राजगुरूनगर शहरातील नागरिकांना येणार होते; मात्र चोरट्यांनी तथा असुंतुष्ट व्यक्तींनी 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर फोडण्याचा प्रयत्न केल्याने राजगुरूनगरवासीसयांच्या तोंडातील पिण्याच्या पाण्याचे घोट पुन्हा हिरावून नेला आहे.
खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर याबाबत नगर परिषदेचे अधिकारी सुनील निकाळजे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, ही घटना रविवारी (दि. 15) उघडकीस आली आहे. तर पाणीप्रश्न व शहरासाठी बसविण्यात येणाऱ्या एक्प्रेस फिडर संदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. 16) नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्ष वैशाली बारणे, नगरसेवक बापू थिगळे, सारिका घुमटकर, संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, स्नेहलता गुंडाळ, नंदा जाधव, सुरेश कौदरे, रफिक मोमीन, राहुल आढारी, किशोर ओसवाल आदी उपस्थित होते.
चास कमान धरणातून वेताळे गावातील डोंगरावरील फिल्टर प्लॅंटमध्ये पाणी शुद्ध करून करून ते राजगुरूनगर शहरातील नागरिकांना देण्यात येणार आहे. वेताळे येथील फिल्टर प्लॅंट, त्यापासूनही मुख्य जलवाहिनी राजगुरूनगर शहराला जोडण्यात आली असून नव्याने तीन टाक्या बांधल्या जात आहेत पैकी दोन टाक्या पूर्ण झाल्या असून तिन्हेवाडी येथील नवीन पाण्याच्या टाकीत पाणी सोडून प्राथमिक चाचणी दोन दिवसांत घेण्यात येणार होती. चास कमान धरणातून वेताळे येथील फिल्टर प्लॅंटमध्ये पाणी उपसा करण्यासाठी 315 केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर चास कमान धरणाजवळ तो बसविण्यात आला होता.
वास्तविक हा ट्रान्सफॉर्मर तयार करण्यासाठी तीन महिने लागले होते. त्यानंतर तो काही दिवसांत बसविण्यात आला. पाणी सुरू करणार तोच चोरट्यांनी अथवा काही कोडकर नागरिकांनी त्याची तोडफोड केली आहे. त्यात मोठे नुकसान झाले आहे. सुमारे लाखभर रुपये ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचा खर्च येणार आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याची गेली अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे यात तांत्रिक अडचणी येत असल्याने ही योजना रखडलेली होती आता ती मार्गी लागणार आहे; मात्र तरीही त्यात अडचणी येत असल्याने नागरिकांना पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चास कमान धरणाजवळ बसविण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर फोडण्याचा व चोरीचा प्रयत्न झाल्याचे रविवारी (दि. 15) उघड झाले. मुद्दामहून हे कृत्ये झाले का चोरीचा उद्देश होता याबाबत खेड पोलीस तपास करणार आहेत. दोन दिवसांत या योजनेतून शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा केला जाणार होता. मात्र, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीला वेळ जाणार असल्याने पाणी योजना सुरु करण्यास विलंब होणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे.
– शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष