राजगुरूनगर -शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तर नागरिकांच्या मागणीनुसार सोमवार (दि. 6) ते सोमवार (दि. 13) आठ दिवस राजगुरूनगर कार्यक्षेत्रात लॉकडाऊन करण्यात येणार असून नागरिकांनी सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीपर्यंत किराणा दुकाने, दूध, भाजीपाला विक्री सुरू ठेवता येणार आहेत. बॅंक, पतसंस्था, हॉस्पिटल, मेडीकल व इतर अत्यावश्यक बाबी सुरु ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवसांच्या काळात मंगल कार्यालये पूर्णपणे बंद राहतील, कालावधी संपल्यानंतर सर्व मंगल कार्यालये यांनी लग्न समारंभ करताना स्थानिक पोलीस प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी बाहेर पडण्यास परवानगी राहील; मात्र प्रतिबंधीत क्षेत्रातील कर्मचारी व नागरिकांना बाहेर पडण्यास सक्तमनाई करण्यात आली आहे.
लॉकडाऊन कालावधीत व लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व नागरिकांना तोंडाला मास्क लावणे बांधणकारक आहे अन्यथा 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.