मुंबई – करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना आपण करत आहोत. मात्र ही लाट काहीशी ओसरत असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, अशी राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.
मागील दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालय बंद आहे. मध्यंतरी काही प्रमाणात सुरू कऱण्यात आले होते. मात्र ओमायक्रॉनच्या सावटामुळे पुन्हा शाळा-महाविद्यालये बंद कऱण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दरम्यान पालकांकडून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यास होकार दर्शवला आहे. जालना शहरात सुद्धा १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी म्हटलं.