बीड – बीड तालुक्यातील पाली येथील शेतकऱ्याच्या विधवा पत्नी ताराबाई यांनी बिंदुसरा धरण सांडव्याच्या स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरु केले आहे. ताराबाई यांचे पती शेतकरी अर्जुन साळुंके यांनी 24 नोव्हेंबर 2020 मध्ये पाटबंधारे कार्यालय बीड येथे अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केले होते. या प्रकरणी बीड येथील कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, भूमी अभिलेख उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच उलट ते अधिकारी दबाव टाकत आहेत असा आरोप ताराबाई यांनी केला. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात झालेल्या अनियमिततेमुळे साळुंके यांचे संपादित क्षेत्र व उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत होऊन ते कमी झाले होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्ष पाठपुरावा केला. मात्र या प्रकरणी संबंधित सरकारी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून त्यांनी बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात आत्मदहन केले होते. या घटनेप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
घरातील कर्ता पुरुष अकाली व धक्कादायकरित्या गेल्याने पीडित परिवाराचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.