राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कॉंग्रेसने मोठी संधी दिली होती; परंतु संकुचितपणाची भावना बाळगणारे गेहलोत यांना या संधीचे महत्त्व समजले नाही. पक्ष नेतृत्वाची त्यांनी माफी मागितली आहे. परंतु गेहलोत यांना राष्ट्रीय पातळीवर जाता येणार नाही, एवढे नक्की!
राजस्थानमध्ये आयुष्यभर स्थानिक राजकारण केल्यानंतर गेहलोत तिथेच रमले. स्थानिक पातळीवर गेहलोत हे चिटकून बसले आणि राजस्थानची सत्ता आपल्या हातून गेली तर पुन्हा कोणीही विचारणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले असावे. जसे विचार, तशी फळेही मिळतात तसेच गेहलोत यांचे झाले. कॉंग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत, त्यांना स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळेच कॉंग्रेसला यश येत नाही. कारण, ज्या पक्षातील नेते पक्षादेश स्वीकारत नाहीत, उद्दामपणा करतात, तो पक्ष नेहमीच अशा नेत्यांमुळे मागे जातो. अशोक गेहलोत यांच्या मनात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळणार, हाच विचार होता. पक्षाचे नुकसान झाले तरी चालेल परंतु दुसऱ्या गटाच्या नेत्याकडे महत्त्वाचे पद गेले नाही पाहिजे, ही मानसिकता बाळगणारे नेहमीच पुढे जात नाहीत. अर्थात त्यामुळे जगरहाटी बंद होत नाही.
उद्या कॉंग्रेसचे अध्यक्षपद दुसऱ्या कोणाकडे असू शकते. राजकारण आहे, त्यामुळे असे प्रकार घडणे विशेष नाही. विशेष हे आहे की, पक्षादेश धुडकावून लावणे आणि आपल्या मनाचा कारभार करणे. कॉंग्रेस श्रेष्ठींच्या हा प्रकार लक्षात आला नसेल असे नाही. परंतु कॉंग्रेसचा प्रतिकूल काळ सुरू आहे, त्यामुळे असे प्रकार होणारच. त्याला कॉंग्रेस सामोरे जाईल. परंतु गेहलोत यांनी केलेली चूक, तेही ज्येष्ठ नेते म्हणून दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. पक्ष त्यांना याबद्दल माफ करेलच, असे नाही. अशोक गेहलोत यांनी अनेक वर्षे राजस्थानमध्ये सत्ता उपभोगली आहे. परंतु सत्तेचे आकर्षण त्यांना वृद्धत्वातही राहिले आहे. त्यांचे मन भरले नाही. राजस्थानचे कॉंग्रेसचे युवा नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी 2020 साली गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. ते बंड गेहलोत यांच्या मनमानीसाठी होते. गेहलोत पायलट यांना पक्षाच्या बैठकीलाही बोलावत नव्हते. पक्ष नेतृत्वाला पायलट यांनी राजस्थानमधील राजकीय पेच सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर पांघरुण घालण्यात आले. सचिन पायलट भाजपामध्ये जाणार असल्याच्या त्यावेळी बातम्या येत होत्या. ज्येष्ठ नेते युवा नेत्यांना काडीची किंमत देत नाहीत, असा पायलट यांचा दावा होता. अखेर पायलट यांनी समंजसपणा दाखवत माघार घेतली आणि तो वाद मिटला. परंतु गेहलोत हे हाच वाद मनात बाळगून होते.
गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचे पक्ष नेतृत्वाने ठरविले आणि त्यासाठी तयारी करायला सांगितली. परंतु गेहलोत यांना, मी राजस्थानमधून दिल्लीला निघून गेल्यानंतर माझ्या गादीचे काय होणार, असा प्रश्न पडला होता. त्या दृष्टीने त्यांनी राजस्थानमध्ये राजकीय सापळा लावला. आपल्या समर्थकांना राजीनामे द्यायला लावून सचिन पायलट यांच्याकडे राजकीय निरीक्षकांनी मुख्यमंत्री पद देऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले. खरे तर पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळणे महत्त्वाचे होते. कारण त्यांनी राजस्थानमध्ये पायपीट केली तेव्हा कॉंग्रेसचा राजस्थानमधील आलेख सुधारला. परंतु गेहलोत यांना सत्तेच्या नशेत विस्मरण झाले. त्यामुळे त्यांनी पक्षालाही अडचणीत टाकले. आपल्या समर्थकांना मुख्यमंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही राजस्थानची सत्ता सोडू शकतो, असा गेहलोतपुरस्कृत आमदारांच्या बंडाचा अर्थ ध्वनित होतो. गेहलोत यांच्यासारखे अनेक पक्षांत संकुचित विचारांचे नेते आहेत, कॉंग्रेसमध्येच आहेत असे नव्हे! मला सत्तेत महत्त्वाचे पद मिळाले नाही तर कुणालाच मिळू देणार नाही, अशी अनेकांची धारणा असते. राजकीय वारसा दुसऱ्याकडे सोपवणे हे दिलदार मनाचे प्रतीक असते. गेहलोत यांना याबाबत काही घेणे-देणे आहे असे वाटत नाही. गेहलोत यांनी राजस्थानमधील कॉंग्रेसमध्ये नेहमीच दडपशाहीचे राजकारण केले. देशात गेहलोत यांच्यासारखे नेते असल्यामुळे राजकारणात नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नाही.
राजस्थानमध्ये घडलेल्या राजीनामास्त्राचा गैरफायदा घेत भाजपा विद्यमान राज्य सरकारच्या अस्तित्वावर आक्षेप घेऊ शकले असते. परिणामी कॉंग्रेसची सत्ता गेली असती. कॉंग्रेसचे भारत जोडो अभियान सुरू असताना महत्त्वाची नेते मंडळी दिल्लीत नाहीत. त्यामुळे राजस्थानमधील कॉंग्रेसची सत्ता गेली असती, तर मोठा पेच निर्माण झाला असता. कॉंग्रेस यापूर्वीच अनेक संकटांचा सामना करीत असताना गेहलोत यांनी नवा पेच निर्माण करून ठेवला, हीच त्यांची मोठी चूक आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारली असती तर त्यात विशेष काहीच नव्हते. परंतु करू की नको अशा विचारात गोंधळलेल्या गेहलोत यांनी पक्षासमोर नवा पेच निर्माण करून धक्का दिला. अर्थात गेहलोत यांनी पक्षश्रेष्ठींचे म्हणणे अप्रत्यक्षरित्या धुडकावून लावले. नंतर ते नेतृत्वाची माफी मागत असतील, तर त्याला काय अर्थ उरतो? राजस्थानमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व एके काळी नगण्य होते.
अशोक गेहलोत यांनी पक्षात काम चांगले केले आहे. परंतु ते नेहमीच स्वत:च्या वर्तुळात राहिले. पक्षाच्या प्रचाराबाबत जागरूक राहिले नाहीत. 2018 साली पायलट यांनी जनाधार मिळवला आणि कॉंग्रेसकडे मतदार खेचून आणला. नंतर सत्ता बनवताना गेहलोत सर्वांच्या पुढे राहिले. ज्येष्ठ नेतेपदाचा फायदा घेत ते पुन्हा राजस्थानच्या सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाले. मेहनत करणारे सचिन पायलट दुय्यम, दुर्लक्षित राहिले. पायलट यांनी गेहलोत यांच्या भेदभावयुक्त वागण्याची पद्धत पाहिल्यानंतर त्यांनी गेहलोत यांच्या मनमानी कारभाराविरोधात बंडाचा पवित्रा घेतला होता. आताही गेहलोत समर्थकांनी पायलट यांना मुख्यमंत्रिपदासाठी विरोध करताना, त्यांनी पक्षाविरोधात पूर्वी बंड केल्याची कोल्हेकुई सुरू केली होती. गेहलोत यांचे अर्धे लक्ष राजस्थानमध्ये तर अर्धे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या उमेदवारीकडे होते. सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही, गेहलोत हे त्याला थोडेच अपवाद असतील? पक्षाध्यक्ष होणे सोपे नाही, ते संकुचित विचारांच्या नेत्याचे काम नाही.