पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीसुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मात्र मला कोणी, अगदी मोदींनीही संपवायचा प्रयत्न केला तर तेसुद्धा मला संपवू शकत नाहीत, असे उद्गार काढून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी खळबळ उडवून दिली आहे. अर्थातच या वक्तव्याची चर्चा सुरू होताच, नेहमीप्रमाणे त्याचे खुलासे करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जर मी तुमच्या मनावर राज्य केले, तर ते तसे करू शकणार नाहीत, असे पंकजा यांना म्हणायचे होते आणि तसेच त्या म्हणाल्या होत्या, असे सांगण्यात आले.
राज्याचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरी गटातील नेते मानले जातात; परंतु त्यांनीदेखील पंकजांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात असल्याचे मत आवर्जून व्यक्त केले. बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी पंकजा यांनी पालकमंत्री असताना जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली आणि त्यामुळे मोठे उद्योग येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. आता परत पंकजा पालकमंत्री झाल्यास राहिलेला विकाससुद्धा पूर्ण होणार आहे, असे म्हणत त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजांना बीडच्या पालकमंत्री होण्यासाठीच्या शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ, पंकजांसाठी त्यांच्या बहिणीनेही थेट फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांची भाजपकडून उपेक्षा होत असून, त्यांची नाराजी रास्त असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि एकेकाळचे गोपीनाथजींचे सहकारी एकनाथ खडसे यांनी भाजपवर तोंडसुख घेतले आहे. अनेक वर्षे ज्यांनी उभे आयुष्य पक्षासाठी वेचले, पक्षाला चांगले दिवस आणून दिले, अशा गोपीनाथजींच्या कन्येला पक्षाकडून स्वाभाविकच मानसन्मान मिळाला पाहिजे, असे खडसे यांचे मत आहे. वास्तविक घराणेशाहीस मोदी यांचा विरोध असून, ही अपेक्षा त्या धोरणात कुठेही बसत नाही.
अर्थात इतक्या वर्षांत पंकजा यांना ना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, ना विधान परिषदेची. धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर, पंकजांचे पुनर्वसन झाले नाही आणि त्यांच्या पराभवात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही भूमिका वठवली. धनंजय मुंडे आणि देवेंद्रजींचे संबंध जवळचे आहेत, असेही सांगितले जात होते. “सध्या मी बेरोजगारच आहे’, असे उपरोधिक उद्गारही पंकजांनी काढले होते. नुकतेच परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दुर्गामहोत्सवात बोलताना त्यांनी, अलीकडे तलवारी, भाले, ढाली यांची गरजच नसून, समाजमाध्यमांतूनच युद्धे लढली जात आहेत, असे सांगितले. समाजमाध्यमांतून आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांना त्यांनी टोमणेही मारले. पंकजांना पक्षाने बिलकुल डावलले नसून, भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, तसेच त्यांची नियुक्ती मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून करण्यात आली आहे, असा युक्तिवाद भाजपकडून नेहमी केला जातो; परंतु पंकजांकडे तूर्तास कोणतेही संसदीय पद नाही. म्हणजेच त्या ना विधिमंडळात आहेत, ना लोकसभा वा राज्यसभेत. त्यामुळे त्या मंत्री वा पालकमंत्री असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त संभाव्य सदस्यांच्या यादीतही पंकजांचे नाव नाही. शिवाय या यादीबाबत
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना फटकारलेदेखील आहे. विनोद तावडे यांच्यावर अन्य राज्यांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि त्यांनी आपले काम निमूटपणे केले. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत त्यांना मानाचे स्थान आहे. पंकजांचा जनाधार तावडे यांच्यापेक्षा निश्चितच मोठा आहे; परंतु त्यांच्यातील बंडखोरी भाजपच्या शिस्तीत बसणारी नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत विश्वासात घेतले जात नाही. आताही दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे समर्थक व विरोधक, असे दोन गट पडले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मराठी वाहिनीवरील एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्याने, “तुम्ही कधी आमदार फोडले आहेत का’, असा सवाल पंकजांना विचारला होता. त्या प्रश्नाला पंकजांनी “होय’, असे उत्तर दिले होते. मात्र, त्याचबरोबर, पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नाही, अशी जाहीर खंतही व्यक्त केली होती. मंत्रिपदासाठी वरिष्ठांची थेट भेट घ्या, असा सल्ला खडसे यांनी पंकजांना दिला होता. याचाच अर्थ, देवेंद्रजी यांनी पंकजांचा कटी पतंग केला आहे आणि त्यांच्या विरोधात श्रेष्ठींकडे तक्रार करावी, असेच खडसे सुचवत होते. मात्र, सतत स्वपक्षावर व नेत्यांवर सूचक टीका करणे, त्यांचा उपहास करणे, वैषम्य व्यक्त करणे हे किती दिवस चालणार? पक्षात त्यांना योग्य स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक संतापलेले आहेत. यात केवळ आपल्या नेत्याबद्दल प्रेम व भक्तिभाव आहे, एवढेच नाही. तर पंकजांना सत्ता न मिळाल्यामुळे मतदारसंघातील कामे होत नाहीत, हे वास्तव आहे.
मुळात राष्ट्रवादीतील अनेक आमदार भाजपात जाण्यास उत्सुक असून, त्यात धनंजय मुंडे यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जाते. गेल्या वेळी देवेंद्र व अजितदादा पवार यांचे सरकार अस्तित्वात आले, तेव्हा धनंजय हे अचानकपणे अदृश्य झाले होते. जसजशा लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येतील, तसतसे पळा पळा, कोण पुढे पळे तो, हे राजकीय नाटक रंगात येईल. या पक्षात आपल्याला आता भवितव्य नाही, हे लक्षात आल्यावर खडसे यांनी वेळेवर ट्रॅक बदलला. आणखी कित्येक वर्षे भाजपच्या राजकारणात फडणवीस यांचे स्थान महत्त्वाचे राहणार आहे, हे लक्षात घेऊन पंकजांना त्यांच्याशी जुळवून तरी घ्यावे लागेल नाहीतर भाजपबाहेर पडून स्वतंत्र पक्ष काढणे किंवा शिवसेना वा अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणे, याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल. केवळ सतत तक्रार करून काहीच हाताला लागणार नाही