औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून, मनसेचे काही पदाधिकारी देखील काल औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असून, आज ( गुरुवारी ) दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं समोर आले आहे.
मात्र पोलिसांनी परवानगी देण्याआधीच भीम आर्मीने ही सभा उधळून लावू असा इशारा दिला आहे. टीव्ही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भीम आर्मीने म्हटले आहे की,’औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू. आमचा या सभेला शेवटपर्यंत विरोध आहे.’
ते पुढे म्हणाले,’ या सभेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे. तसेच या सभेमुळे हिंदू-मुस्लीम दंगली होणार. त्यामुळे जरी या सभेला पोलिसांनी परवानगी दिली तरी सुद्धा आम्ही ही सभा होऊ देणार नाहीच. या सभेला राज्यातील अनेक लोकांन कडून विरोध होत आहे. जो शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. तो प्रत्येक नागरिक या सभेला विरोध करत आहे.’ असेही भीम आर्मीने माध्यमांना सांगितले.
दरम्यान, या सभेला पोलिसांकडून परवानगी देताना काही अटी आणि शर्ती सुद्धा घालून दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बहुचर्चित औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.