मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
अश्यातच, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांची सभेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता जनतेची भावना राज ठाकरे आपल्या भाषणातून व्यक्त होईल, त्याबद्दल ते भाष्य करतील’, असे सरदेसाई यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, राजसाहेब काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला लागून राहिली आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर ते बोलतील अशी अपेक्षा आहे’. असं सुद्धा नितीन सरदेसाई यांनी यावेळी म्हंटलं. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. येत्या 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता राज ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवतीर्थावर धडाडणार आहे.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याचा टीजर चर्चेत….
॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/tNNFDn16nf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2023
मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आलेल्या टीजरमध्ये राज ठाकरेंच्या भाषणातील एक डायलॉग वापरण्यात आला आहे. “ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व” या टॅगलाईन खाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे ही पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील असा टीजरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.