ठाणे – मुंबईसह ठाण्यात तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने पुरजन्य परिस्थिती आली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर मासूंदा तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
ठाण्यातील हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे. उल्हासनगरमध्ये तब्बल 400 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्गदेखील पाण्याखाली गेला आहे. मागील तीन दिवसांपासून हा महामार्ग पाण्याखाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
त्याचबरोबर, दिवा शिळ चौक ते मुंब्रा खान कम्पाउंडपर्यंत संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मागील बऱ्याच काळापासून याठिकाणी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अजूनही ठाणे शहरात पावसाचा जोर वाढत असून असाच पाऊस सुरू राहिल्यास 26 जुलै 2005 सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईची तुंबई!
मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसाने सर्वत्रच पाणीच पाणी केले आहे. आता मुंबईची अक्षरशा तुंबई झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश भागामधील रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत.
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना घराबाहेर पाडावे लागले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये तर दुचाकी वाहनं रस्त्यावरील पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. कांदिवलीतील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जवळपास 400 वाहने या पाण्याखाली गेली असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.