24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – शुक्रवारपासून अपवाद वगळता मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढच्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा असून किनारपट्टी भागात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी, दहिसर, ठाणे, नवी मुंबई, कांदिवली, सांताक्रुझ, गोरेगावसह पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान तिन्ही मार्गावरील लोकलसेवा खोळंबली आहे. मुसळधार पावसाने ठाण्यामधील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. ठाण्यात अवघ्या 2 तासांत 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा देखील प्रभावित झाली आहे. पावसामुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला.
तसेच वसई-विरारमध्येही पावसाचा जोर आहे. नालासोपारा पूर्व इथे स्टेशन परिसरात पुलाखाली आणि सेंट्रल पार्क इथे पाणी साचले आहे. रात्री एक वाजता नालासोपारा पूर्वचा स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. सकाळीही या रस्त्यावर फूट ते दीड फुट पाणी साचलेले होते. त्याचप्रमाणे नालासोपाराचा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या खाली पूर्णपणे पाणी साचले होते.
दरम्यान, भिवंडीत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. भिवंडी शहरात मुसळधार पाऊस होत असल्याने कामवारी नदीची पातळी वाढली असून नदी दुथडी वाहत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. आज सकाळच्या सुमारास भातसा धरण ओसंडून वाहू लागले. त्यामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे दोन फुटापर्यंत उघडण्यात आले आहे. भातसा धरण वाहू लागल्याने, भातसा नदीच्या पात्रातही पाण्याची पातळी वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरणाखालील शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.