महाराष्ट्रात 399 जणांनी गमावला जीव
नवी दिल्ली : चालू हंगामात पाऊस आणि पुराने देशाच्या विविध भागांत थैमान घातले. त्यामुळे देशभरात 2 हजार 120 जण मृत्युमुखी पडले. सर्वांधिक जीवितहानी झालेल्या महाराष्ट्रात 399 जणांना त्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीव गमवावा लागला.
यंदा चार महिन्यांच्या हंगामात देशात 1994 नंतरच्या सर्वांधिक पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा फटका बसला. त्याशिवाय, दरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या. पाऊस आणि पुरामुळे घडलेल्या दुर्घटनांत अजूनही देशभरात 46 जण बेपत्ता आहेत. देशभरात 738 जण जखमी झाले. त्यात महाराष्ट्रातील संख्या 369 इतकी आहे. महाराष्ट्राखालोखाल पश्चिम बंगालमध्ये नैसर्गिक आपत्तीने 227 जणांचा बळी घेतला. मध्य प्रदेशात 182, केरळमध्ये 181, गुजरातमध्ये 169 तर बिहारमध्ये 166 जण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, कर्नाटकमध्ये 106 तर आसाममध्ये 97 जणांचा जीव गमवावा लागला.
पाऊस आणि पुरामुळे देशाच्या 22 राज्यांतील 25 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले. देशातील 357 जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यांमधील 7 लाख लोक पाऊस आणि पुरामुळे प्रभावित झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरातील 14 लाख हेक्टर्स क्षेत्रावरील पिके उद्धवस्त झाली. देशभरात 20 हजार जनावरे दगावली. तसेच, 1 लाखहून अधिक घरे कोसळली.