रेल्वे सेवांच्या खासगीकरणाचे रेल्वे मंडळाकडून समर्थन
नवी दिल्ली – केंद्र सरकारने रेल्वेच्या 152 मार्गांवरून खासगी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रोजगारात घट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, उलट रोजगारात वाढ होईल, रेल्वेत आधुनिक तंत्रज्ञान येईल, असा दावा रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी केला आहे.
रेल्वे सेवांच्या खासगीकरणामुळे सामान्य माणसाचे वाहतुकीचे साधन केंद्र सरकार हिरावून घेत आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. यावर यादव म्हणाले की, देशभरात रेल्वेचे जेवढे मार्ग आहेत, त्यापैकी केवळ पाच टक्के मार्गावर खासगीकरणाचा प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे. इतर 95 टक्के मार्गांवर सध्या ज्या पद्धतीने रेल्वे सेवा दिली जाते त्याच पद्धतीने रेल्वे सेवा दिली जाणार आहे. सध्या देशभरात 2,800 रेल्वे सेवा चालविल्या जातात. केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या या सेवांच्या संख्येमध्ये कसलाही बदल होणार नाही.
उलट आगामी काळात रेल्वे मार्गाची परिस्थिती सुधारल्यानंतर गरज पाहून या सेवांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. सर्व मार्गावरील प्रवासाचे भाडे रेल्वे विभाग ठरविणार आहे. त्यामुळे कोणी जास्त दर करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. 2030 पर्यंत भारतातील रेल्वे प्रवाशांची संख्या 13 अब्जांवर जाणार आहे. त्यामुळे भारताला दरम्यानच्या काळामध्ये रेल्वे सेवांचे आधुनिकीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि भांडवलाची गरज भासणार आहे. त्यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्रवासी सेवा तोट्यात चालते.
ही तूट मालवाहतुकीतून भरून काढली जाते. आगामी काळात दोन्ही प्रकार फायदेशीर चालतील यासंदर्भात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मात्र, हे काम दीर्घ पल्ल्याचे आहे, असे ते म्हणाले.
वेटिंग लिस्ट जास्त
सध्या रेल्वे सेवा आणि मागणीच्या पुरवठ्यात तफावत आहे. गेल्या वर्षी पाच कोटी लोकांना वेटिंग लिस्टवर राहावे लागले. त्यामुळे रेल्वेचा विस्तार करण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता विविध पर्यायांवर विचार करावा लागणार आहे. सहा वर्षांमध्ये रेल्वेच्या सेवा अशा पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत की, पुढील वर्षी जास्त लोक वेटिंग लिस्टवर राहणार नाहीत. रेल्वे सेवा ज्या मार्गावरून चालते त्या मार्गावरील विमानाचे भाडे, एसी बसचे भाडे या सर्वाचा विचार करून रेल्वेचे भाडे ठरवावे लागते. अन्यथा रेल्वेचे प्रवासी कमी होऊन पर्यायी मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते.