नवी दिल्ली – रेल्वेतील नोकरीसाठी जमीन प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Former Bihar Chief Minister Rabri Devi) आणि त्यांच्या मुली मीसा भारती आणि हेमा यादव यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. देवी, भारती, यादव आणि हृदयानंद चौधरी या आरोपींनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर विशेष न्या. विशाल गोगणे यांनी हा आदेश दिला.
न्या. विशाल गोगणे म्हणाले, कोणतीही याचिका रेकॉर्डवर आणण्यासाठी ईडीची विशिष्ट विनंती लक्षात घेऊन, उत्तर दाखल झाल्यानंतर अर्जावर निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत अर्जदार/आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला जातो. ईडी पुढील तारखेपूर्वी आरोपीच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करेल.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने बजावलेल्या समन्सचे पालन करून आरोपी न्यायालयात हजर झाले. तपासादरम्यान आरोपींना अटक केली नसताना त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने कारवाईदरम्यान ईडीला केला. विशेष सरकारी वकिलांनी उत्तर दिले की, तपासादरम्यान आरोपींना अटक करण्यात आली नसली तरी संबंधित परिस्थिती रेकॉर्डवर आणण्यासाठी जबाब नोंदवणे आवश्यक आहे.
आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी जामिनाची विनंती करताना दावा केला की, तपासादरम्यान अटक न केल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याने ईडीकडून उत्तर दाखल करण्याची गरज नाही. अंतरिम जामीन प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनाच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला. या प्रकरणातील आरोपपत्राची दखल घेत न्यायाधीशांनी आरोपींना समन्स बजावले होते.