पुणे – महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनतर्फे (महारेल) राज्यभरात रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील रेल्वे फाटके कायमची बंद करण्यासाठीची तयारी ही महारेलने दर्शवली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने काम दिल्यास जिल्ह्यातही रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येतील, असे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितले. पुणे विभागात 112 रेल्वे फाटके आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मिरज, सोलापूर लोहमार्गांवरील रेल्वे फाटकांचा समावेश आहे. या मार्गांवर रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यावेळी रेल्वे फाटक परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागून प्रचंड कोंडी होते.
रेल्वे फाटक उघडेपर्यंत वाहनचालकांना थांबावे लागते. परिणामी वेळेचा व इंधनाचा अपव्यय होतो. याशिवाय रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक खालून ये-जा करतात. त्यामुळे अपघातांचा धोकाही संभवतो. यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू असताना प्रशासनाकडून आता रेल्वे फाटक हटवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
अपघामुक्तीसाठी निर्णय
रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महारेलच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारली जात आहेत. त्यामुळे रेल्वे फाटक कायमचे हद्दपार होणार आहेत. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातही अपघातमुक्त वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास महारेल तयार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीत वाढ
पुणे शहरात घोरपडी येथे सोलापूर व मिरज लोहमार्गावर दोन रेल्वे गेट आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान कासारवाडी येथे रेल्वे फाटक आहे. याशिवाय जिल्ह्यात वाल्हे-नीरा दरम्यान थोपटेवाडी येथे, कामशेत-वडगाव स्थानकादरम्यानही रेल्वे फाटके आहेत. या रेल्वे फाटकांमुळे स्थानिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या वेळेची बचत होणार आहे.