Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 288 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहे. या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. याशिवाय या अपघतात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मदत देखील जाहीर करण्यात आली.
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांंना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचबरोबर या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर मोदींनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या अपघतानंतर अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने अपघातग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अपघातात आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पोरके झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो उचलणार आहे. त्या मुलांना ‘बोर्डिंग फॅसिलिटी ऑफ सेहवाग स्कूल’ मध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय विरेंद्र सेहवागने घेतला आहे. 4 जून रोजी ट्वीट करत त्याने ही माहिती दिली आहे.
सेहवागने ट्वीट करत लिहिले की, “दु:खाच्या या प्रसंगी अपघातात आपले गमावणाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं काम तर मी करूच शकतो. त्यांना मी सेहवाग स्कूलच्या बोर्डिग फॅसिलिटीमध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. सर्वच कुटुंबीयांप्रती संवेदना आणि बचाव कार्यात पुढे आलेल्या, मेडिकल टीम, रक्तदाते अशा सर्व धाडसी लोकांचंही कौतुक. आम्ही यात तुमच्या सोबत आहोत.”
This image will haunt us for a long time.
In this hour of grief, the least I can do is to take care of education of children of those who lost their life in this tragic accident. I offer such children free education at Sehwag International School’s boarding facility 🙏🏼 pic.twitter.com/b9DAuWEoTy
— Virender Sehwag (@virendersehwag) June 4, 2023
यासोबत त्याने रेल्वे अपघाताचा एक फोटोही शेअर केला आहे. सध्या सेहवागच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सेहवाग सह अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी देखील या अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली.
दरम्यान, याआधी देखील सेहवाग मदतीसाठी धावून आला आहे. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने घेतली होती. याशिवाय करोना काळात देखील त्याने गरजूंसाठी मोफत भोजनाची सोय केली होती.