पुणे, दि. 26 -तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिटाच्या स्वयंचलित वेंडिंग मशिन उपलब्ध करून दिल्या खऱ्या; पण या मशिनवर कार्यरत असलेले खासगी ठेकेदाराचे कामगार प्रवाशांकडून टॅक्सच्या नावाखाली तिकिटामागे दहा-वीस रुपये जास्त उकळत आहेत. विशेष म्हणजे याची पुसटशीही कल्पना प्रशासनाला नाही.
या मशिनद्वारे प्रवाशांना उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याचे तिकीट काढण्याची सुविधा आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांकडे एटीव्हीएम कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरवर उपलब्ध आहे. पण, ज्या प्रवाशांकडे हे कार्ड उपलब्ध नाही, त्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने खासगी कर्मचाऱ्यांची (फेसिलिटेटर) नेमणूक केली आहे. त्यांना प्रत्येक तिकीटावरील छापील किमतीच्या तीन टक्के कमिशन दिले जाते. तरीसुद्धा या ऑपरेटरकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचे उघड झाले आहे. सोमवारी दोन प्रवासी भुवनेश्वरला जाण्यासाठी पुणे स्टेशनमध्ये आले होते. त्यांनी तिकीट खिडकीवरील रांगा बघून एटीव्हीएम मशीनवरील कर्मचाऱ्याकडून तिकीट घेतले. पुणे ते भुवनेश्वर तिकीटाची किंमत 420 रुपये असताना कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून 430 रुपये घेतले. संबंधित प्रवाशांनी जास्तीच्या पैशाविषयी विचारले असता, त्या कर्मचाऱ्याने टॅक्सचे कारण दिले. प्रवाशांना मराठी वाचता येत नसल्याने ते देखील टॅक्स असेल म्हणून काही न बोलता निघून गेले. असाच प्रकार दुसऱ्या एका प्रवाशाबरोबर देखील झाला. यावरून हे जादाचे पैसे सरकारच्या तिजोरीत जातात की, अजून कोणाच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला याची खरेच माहिती नाही का, की प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न प्लॅटफॉर्मवरील काही प्रवाशांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना उपस्थित केला.
प्रवाशांनी छापील किमतीएवढेच पैसे द्यावे. जर त्यापेक्षा अधिक पैसे घेतले असल्यास प्रवाशांनी स्थानकातील स्टेशन मास्तरांकडे तक्रार करावी. तक्रार आल्यास संबंधित फेसिलिटेटरवर कारवाई केली जाईल.
मनोज झंवर,
जनसंपर्क अधिकारी
मी एटीएमव्ही मशिनवरील कर्मचाऱ्याकडून भुवनेश्वरचे तिकीट काढले. तिकीटाची रक्कम 420 असताना त्याने माझ्याकडे 430 रुपयांची मागणी केली. जास्तीचे पैसे कसले विचारले असता सरकारी टॅक्स असल्याचे त्याने सांगितले.
-गौतम दास, प्रवासी