रुळांलगत बकालता वाढली : कारवाईबद्दल प्रशासन सुस्त
पुणे – पुणे रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूला सर्रास अतिक्रमणे झाल्याचे चित्र पुणे विभागात दिसत आहे. मात्र, अतिक्रमणांवर रेल्वेकडून होणाऱ्या कारवाईचे प्रमाण अगदीच कमी आहे. या अतिक्रमणांचा रेल्वेला मोठा फटका बसू शकतो, असे संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक सांगतात.
रेल्वेमार्गाच्या आजूबाजूला झोपड्या, दुकानांच्या रांगा असतात. रेल्वे स्थानक आवारातील अतिक्रमणांवर होणारी रेल्वेची कारवाई मात्र तोंडदेखली आहे. शिवाजीनगर, घोरपडी, खडकी, बोपोडी, चिंचवड आदी स्थानकांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झोपड्यांची वस्ती आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस गुंडगिरीदेखील वाढत असल्याने कोणाचेही काही चालत नाही. शिवाय परिसरात बकालपणा वाढत आहे. रेल्वे स्थानक आसपासचे नागरिक तारांवर विविध वस्तू टाकतात.
यापूर्वी अशा वर्तनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बिघाड झाला होता. इतकेच नव्हे, तर यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका असतो. लहान मुले खेळतात, रेल्वेमार्ग बिनधास्तपणे ओलांडतात. तर, अतिक्रमणांमुळे रेल्वे स्थानकांनाही धोका आहे. रेल्वेच्या संरक्षण भिंतींची उंची कमी असल्याने सहज कोणीही रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये प्रवेश करू शकतात, असे संरक्षण शास्त्रातील अभ्यासक सांगतात.
फक्त तीन मोठ्या कारवाया
रेल्वे प्रशासनाने मार्गाचे काम हाती घेतल्यानंतर अतिक्रमणे हटवणे सुरू केले. यात सन 2018 आणि 2019 मध्ये घोरपडी, पिंपरी आणि शिवाजीनगर या स्थानकांच्या बाजूच्या जागेवरचे अतिक्रमण रेल्वेने हटवले.
रेल्वे स्थानक आवारातील अतिक्रमणे हटवण्याचे काम सातत्याने सुरू असते. स्थानिक पोलीस, महापालिका, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासन संयुक्तपणे अतिक्रमणांवर कारवाई करते. अतिक्रमण हटवण्यासाठी दोन ते तीन वेळा नोटीस देण्यात येते. महानगरपालिकेला सुद्धा याबाबत पूर्व कल्पना देण्यात येते.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
पुणे विभागात अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाशेजारीच घर उभारली आहेत. सामान्य माणसाने घर घेतल्यास त्यांना अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. मात्र, रेल्वेच्या जमिनीवर घर उभारलेल्या नागरिकांकडे कोणत्याच कागदपत्रांची मागणी प्रशासन करत नाही. अतिक्रमणांना स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद आहे. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई होणे आवश्यक आहे.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ