नवी दिल्ली : देशामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील आता सज्ज झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधीचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असल्याचे दिसत आहे.
नफ़रत को हराने का सही मौक़ा है।#Elections2022
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 10, 2022
द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ, असं ट्वीट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलं आहे.
करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.
15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.