मुंबई – ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे. याशिवाय राज्यात करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यात एकाच दिवसात करोनाचे 44 हजार 388 नवीन रुग्ण मिळाले आहेत तर 12 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन 1 हजार 216 वर पोहचली आहे. त्यामुळे राज्यात आजपासून कलम 144 लागू करण्यात आले असून करोनाशी संबंधित नवीन नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. थोडक्यात आजपासून महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला असून आज पहिला दिवस आहे.
मुंबईच्या धारावीत चिंता, दादर आणि माहीममध्येही करोना रुग्णांमध्ये वाढ
मुंबईत सलग चार दिवसांपासून करोना रुग्णांचा आकडा वीस हजारांवर आहे. तीन दिवस हा आकडा वीस हजारांच्या पुढे होता पण रविवारी तो वीस हजारांच्या (19 हजार 474) जवळ गेला. मुंबईतील धारावी, दादर आणि माहीममध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.धारावीत शनिवारी 147 रुग्ण आढळले. दादर आणि माहीममध्ये 213 आणि 214 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या धारावीमध्ये पॉझिटिव्हिटी रेटचे प्रमाण २१ टक्के आहे.
राज्यात काय-काय सुरु राहणार?
*राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
*पहिल्या लाटेमध्ये सलून चालकांचं आणि कामगारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता *50 टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची मुभा
*खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
*हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
*शॉपिंग मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
*पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास परवानगी
राज्यात काय काय बंद राहणार?
*खेळाची मैदानं, उद्यानं, बागा, बंद
*राज्यातील सगळी पर्यटन स्थळ टोटली बंद राहणार
*स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णत: बंद राहणार
*एंटरटेन्मेंट पार्क, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, गडकिल्ले पुढील आदेशापर्यंत बंद
*शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी काय नियमावली?
*लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
*अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
*सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी