मुंबई – राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने, राज्यातील काँग्रेस नेते या यात्रेच्या “वाढीव” सुरक्षा मागण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची भेट घेत आहेत. १२ मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांचे शिष्ट मंडळ पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी राज्यात सुरक्षा वाढवण्याची विनंती करणार आहेत.
१२-१७ मार्च दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेचा अंतिम टप्पा महाराष्ट्राच्या विविध भागातून जाणार आहे. या यात्रेत इंडिया आघाडीचे सदस्य उपस्थित राहतील. यात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, शिवसेनेचा ठाकरे गट, स्वाभिमानी विकास परिषद आणि वंचित बहुजन आघाडी या साररखे छोटे पक्ष देखील राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यासह काही ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर राहुल गांधी यांची ही यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने त्याला विशेष महत्व दिले जात आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांतून ६७०० किमीचा प्रवास करत अंतिम टप्प्यात आली आहे.