नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रायपूर (Raipur) येथील प्रचार सभेत बोलताना छत्तीसगडमधील सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता कायम राहिल्यास तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांना वर्षाला 4,000 रुपये मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना, गांधींनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) उद्देशून असा सवाल केला की जर मोदी आपल्या भाषणात आपण ओबीसी असल्याचा उल्लेख सतत करतात तर मग ते ओबीसींची जात जनगणना करण्यास का घाबरतात.केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आल्यास देशात जात जनगणना केली जाईल, असे ते म्हणाले.ते म्हणाले की आज गरीबांना शिक्षण (Education) देण्याची गरज असून त्यासाठी आम्ही या राज्यात बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे सरकारी शाळा महाविद्यालयांतील शिक्षण पुर्ण मोफत करू.
मोदी सरकार (Modi Sarkar) सध्या दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्यासाठीच काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पण त्या उलट कॉंग्रेस शेतकरी, दलित, मजूर आणि आदिवासींच्या हितासाठी काम करते, असे ते म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने दिलेली महत्त्वाची आश्वासने छत्तीसगडमध्ये पूर्ण झाली असल्याचा दावा त्यांनी केला.भाजप अदिवासींचा उल्लेख वनवासी असा करते त्यावर आक्षेप घेऊन राहुल गांधी म्हणाले की, हा आदिवासींचा अपमान आहे आणि त्यांची संस्कृती, इतिहास आणि भाषेवर हल्ला आहे.