हॉंगझोऊ :– चीनमधील येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये शनिवारी भारतीय पॅरा ऍथलीट्सने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना एकूण 111 पदकांसह आपल्या मोहिमेचा शेवट केला. अशाप्रकारे भारताच्या पॅरा खेळाडूंनी प्रथमच 100 पदकांचा टप्पा ओलांडून आपले यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय पॅरा खेळाडूंनी 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य पदके जिंकली. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 107 पदके जिंकली होती.
आशियाई पॅरा गेम्स पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे. चीनने 521 तर इराणने 131 पदके जिंकली. जपान तिसऱ्या आणि कोरिया चौथ्या स्थानावर आहे. 2010 मध्ये ग्वांगझू येथे पहिल्या पॅरा आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भारत 14 पदके जिंकून 15 व्या स्थानावर होता. यानंतर, भारत 2014 मध्ये 15 व्या आणि 2018 मध्ये नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने 100 हून अधिक पदके जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताने 101 पदके जिंकली होती.
ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक 55 पदके
भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या पॅरा ऍथलीट्सने देशाचा गौरव वाढविला आहे. आता आमच्या भारतीय खेळाडूंकडून आगामी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टोकियोपेक्षा जास्त पदके जिंकण्याच्या आशा आहेत. आम्हाला 110 ते 115 दरम्यान पदक मिळण्याची अपेक्षा होती आणि 111 हा शुभ आकडा गाठल्याचा आनंद आहे.
That’s it! HISTORY MADE at #AsianParaGames2022!! 🥳🥳
We promised, we delivered! Team 🇮🇳 returns home with 1⃣1⃣1⃣ medals, a superb number, surpassing all odds and adversities!
Super proud of our para athletes🤩🤩 #IsBaar100Paar#Cheer4India 🇮🇳#Praise4Para#HallaBol… pic.twitter.com/D9FNbDnRaY
— SAI Media (@Media_SAI) October 28, 2023
भारतीय खेळाडूंनी ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक 55 पदके जिंकली तर बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णांसह 21 पदके जिंकली. बुद्धिबळात आठ आणि तिरंदाजीमध्ये सात तर नेमबाजांनी सहा पदके जिंकली. शनिवारी शेवटच्या दिवशी भारताने चार सुवर्णांसह 12 पदके जिंकली. यापैकी सात पदके बुद्धिबळात, चार ऍथलेटिक्स आणि एक सेलिंगमध्ये जिंकली, अशी माहिती यावेळी बोलताना भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी दिली.