नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राहुल गांधी जन्मातही विर सावरकर यांची बरोबरी करू शकत नाही. ते सावरकरांच्या केसाऐवढेही नाहीत, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींना लगावला आहे. लेखिका शुभांगी भडभडे लिखित “मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर सावरकरांच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल चढवला. “मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ ही कादंबरी “जयोस्तुुते’ या नावाने हिंदी भाषेत देखील संघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गुजरातमध्ये प्रकाशित झाली आहे.
फडणवीस म्हणाले, कोलूवर दिवसभर श्रम करून ज्या व्यक्तीला महाकाव्य स्पुरते त्या व्यक्तीची क्षमता काय आहे. याच अंदाज राहुल गांधींना कधी येऊच शकत नाही, अशा प्रकारचे अत्याचार शोषत असताना सोबतच्या लोकांसाठी संघर्ष उभा करायचा हे कार्य केवळ सावरकर करू शकतात. सावरकरांचे बंधू देखील त्याच कारागृहात असताना त्यांची कधी भेट होत नव्हती. झालीच तर केवळ नजरेने ते एकमेकांशी बोलत होते.
इतके अत्याचार सुरू असताना आपल्या सोबतच्या कैद्यांसाठी त्यांनी संघर्ष उभा केला. सावरकरांनी हजारो देशभक्त तयार केले. राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाही. तुम्ही सावरकरांच्या केसाएवढे देखील होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे सावरकर नाही हे जे सत्य बोलतात, त्यावर मी आपले आभार मानेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, कार्यंक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. स. जोग होते. तसेच कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी कादंबरीवर यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.