पुणे, दि. 8 -“खासदार राहुल गांधी यांना “प्रोजेक्ट’ करण्याचा कॉंग्रेसचा आता 13-14 वा प्रयोग आहे. असे असतानाही 40-50 वर त्यांचे खासदार निवडून येत नाहीत, शिवाय त्यांचे वर्चस्व असलेल्या राज्याची संख्या एक दोनच्या वर जात नाही. पण कोणत्याही पक्षाने हार न मानता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. गुजरात आणि हिमाचलमध्येही आगामी काळात निवडणुकीत भाजप आघाडीवर असेल,’ असा दावा उच्चशिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी येथे केला.
मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. “राज्यातील राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. एखाद्या विषयावर वक्तव्य करणे, मत देणे, त्यावर प्रतिक्रिया देणे आणि त्यांना प्रसारमाध्यमांनी किती महत्त्व द्यायचे हा देखील विषय महत्त्वाचा आहे. अशी राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. काय बोलायचे, कसे वागायचे याची एक आचारसंहिता सगळ्या पक्षांनी एकत्र बसून बनवायला हवी असे मला वाटते.
कोणीतरी हे बनवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,’ असे मत पाटील यांनी मांडले. “मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्र्यांना “खोके’ या विषयात लक्ष्य केले जात आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याला कोणाची सहमती नाही. सत्तारांनी माफी मागावी असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे माफी मागितलीही गेली. त्यामुळे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विषय संपवला पाहिजे,’ असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले.