Rahul Gandhi – केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरुणांच्या हाताला काम देण्यात साफ अपयशी ठरले आहे. केवळ इंडिया आघाडीच तरुणांच्या हाताला काम देऊ शकते.
देशातील सर्व संस्था भाजपच्या ताब्यात असून, त्यांच्या बळावर भाजप विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी केला. ते काँग्रेस पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त येथे आयोजित महारॅलीला संबोधित करतान बोलत होते.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजप सरकार आल्यापासून त्यांच्या काही मित्रांना केवळ फायदा होत आहे. मोजक्या लोकांच्या हातात देशातील संपत्ती जात आहे. मी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला तर भाजपचे लोक शांत झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांमध्ये किती रोजगार दिले? हे आता जाहिर करावे. तसेच आम्ही सत्तेत आलो तर देशात जातीनिहाय जनगणना करु असे, आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात गरिबी हीच एकमेव जात असल्याचा दावा करतात. असे असेल तर ते स्वतःची ओळख ओबीसी म्हणून का करून देतात? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
यासह देशातील करोडो युवकांच्या हाताला काम नाही, त्यांची शक्ती वाया जात आहे. तो बेरोजगार असल्याने सोशल मिडीयावर जास्त वेळ देत आहे. देशातील तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर हे सरकार हल्ले करत आहे, असा पुनरोच्चारही त्यांनी यावेळी केला.
भाजपमध्ये गुलामी सुरू
भाजपचे अनेक खासदार हे काँग्रेसमध्ये होते. यातील एक खासदार मला भेटले. भाजपमध्ये राहणे आम्हाला सहन होत नाहीये. आम्ही भाजपमध्ये असलो तरी आमचे मन मात्र काँग्रेसमध्येच आहे, असे त्यांनी म्हटले.
भाजपमध्ये गुलामी चालते, हायकमांड जे सांगते ते ऐकावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही, पहिले जसे राजा ऑर्डर देत होते तसेच आम्हाला भाजपमध्ये रहावे लागते. ते पटो वा न पटो त्यांचे सर्व ऐकावे लागते, असेही त्या खासदाराने सांगितल्याचे राहुल गांधींनी यावेळी म्हटले.