पाटणा – ललन सिंह राजीनामा प्रकरणामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली असताना संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नितीश कुमार राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यातच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीराज सिंह यांनी एक सनसनाटी निर्माण करणारे विधान केले आहे. नितीश कुमार आता थोड्याच दिवसांचे पाहुणे असून ते लवकरच बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होतील असे गिरीराज यांनी म्हटले आहे.
नितीश आता मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्याकरता लालू प्रसाद यादव यांनी चक्रव्यूह रचले आहे. या चक्रव्यूहाचा पहिला टप्पा म्हणजे अवध बिहारी यांना बिहार विधानसभेचे अध्यक्ष करणे हा आहे. त्यानंतर लवकरच नितीश हे माजी मुख्यमंत्री होतील. नितीश आता मुख्यमंत्री राहणार नाहीत हे ठरले असून लवकरच बिहारला राष्ट्रीय जनता दलाचा नेता मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळणार आहे.
नितीश तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करत नसल्यामुळे लालूही त्यांना फार काळ या पदावर राहु देणार नाहीत. नितीश यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवण्यात आले आहेत. तेजस्वी यांना मुख्यमंत्री करणे आणि संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दलात विलीन करणे. जर त्यांनी ते मान्य केले नाही तर त्यांचे जाणे निश्चित आहे.
गिरीराज पुढे म्हणाले की नितीश केवळ नौटंकी करून लालूंना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. ते आणि लालू केवळ स्वार्थामुळे परस्परांना चिकटून आहेत. यातला एक जण मुलाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहतो आहे तर एक जण देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या गावागावांतील कार्यकर्त्यांनी आता नितीश यांच्यासाठी दारे बंद केली आहेत. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेईल असा विचार नितीश यांनी आता स्वप्नातही करू नये.