नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीसंदर्भातील नोटिशीवर लोकसभा सचिवालयात उत्तर सादर केले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र सुपूर्द केल्यानंतर सचिवालयाने त्यांना नोटीस बजावून १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.
भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांचे विधान दिशाभूल करणारे, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय आणि पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे असल्याचे म्हटले होते. त्यात असे म्हटले आहे की, सभागृहाचा अवमान झाल्याची स्पष्ट केस असण्याबरोबरच, राहुल गांधींचे वर्तन हे सभागृहाच्या आणि सदस्यांच्या विशेषाधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे असे म्हंटले होते.
राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली होती. दुसरीकडे, नुकतेच वायनाड लोकसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना, गांधी यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान आपल्या भाषणातील अनेक विधाने हटविण्याच्या निर्णयावर टीका केली.