नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तीन वर्षांपूर्वी अचानकपणे केलेल्या नोटाबंदीला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. याच निर्णयावर तेव्हापासून टीका करणाऱ्या विरोधकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा या निर्णयामुळे देशाचे कसे नुकसान झाले, याची आठवण करून दिली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट केले असून, त्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
It’s 3 yrs since the Demonetisation terror attack that devastated the Indian economy, taking many lives, wiping out lakhs of small businesses & leaving millions of Indians unemployed.
Those behind this vicious attack have yet to be brought to justice. #DeMonetisationDisaster pic.twitter.com/NdzIeHOCqL
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2019
या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्याला 3 वर्षे पूर्ण झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा बळी गेला, अनेक छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अनेक भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या. हे सर्व ज्यांच्यामुळे घडले त्यांच्यावर अजून कायदेशीर कारवाई झालेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटसोबत त्यांनी ग्राफिक्सही जोडले आहे. ज्यामध्ये नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या आकाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीचे विविध परिणाम नंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे पाहायला मिळाले होते.