मूडीजकडून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त
नवी दिल्ली : भारतातील आर्थिक विकासावरून मागील काही दिवसांपासून मोदी सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतानाच आता आणखी एक बॅड न्यूज समोर आली आहे. मूडीज या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार सेवा संस्थेने भारताच्या रेटिंग्जमध्ये ‘स्थिर’वरून ‘नकारात्मक’ असा बदल केला आहे. देशातील आर्थिक परिस्थितीत नजीकच्या काळात फार सकारात्मक बदल होणार नाहीत, हे दिसत असल्यामुळेच या संस्थेने रेटिंग्जमध्ये बदल केले आहेत.
भारताचा विकासदर येत्या काळातही कमीच राहणार आहे. देशातील दीर्घकालीन धोरणात्मक अस्थिरता आणि धोरणांच्या अंमलबजावणीतील कमकुवतपणा याचा विकासदरावर परिणाम कायम राहणार आहे. त्यामुळेच मूडीजने रेटिंग्जमध्ये नकारात्मक असा उल्लेख केला आहे. याचा परिणाम देशातील गुंतवणुकीवरही होऊ शकतो, असे आर्थिक अभ्यासकांनी म्हटले आहे.
आर्थिक आघाडीवर सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसलेला नाही.
रोजगार निर्मितीचा अभाव, बॅंकाव्यतिरिक्त इतर आर्थिक संस्थांची ढासळती पत, ग्रामीण भागातील कुटूंबांमधील आर्थिक ताण यावर अजून परिणामकारक उपाय शोधता आलेले नाहीत. त्याचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसते आहे.