संदीप मोरे
रहिमतपूर – केंद्र शासनाने नगरपालिका पाणीपुरवठ्यासाठी अमृत 2.0 ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत रहिमतपूर नगरपालिकेसाठी 29 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या मंजुरी वरून सध्या रहिमतपूर मध्ये नगरपालिकेचे सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने
व विरोधी पक्षनेते नीलेश माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यात श्रेय वादावरून चांगलीच जुंपली आहे. मात्र, यामध्ये रहिमतपूरकरांचे मनोरंजन सुरु असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
शहरांच्या वाढीव लोकसंख्येचा निकष ठेवून केंद्र शासनाने अमृत 2 . 0 योजना आणली. या योजनेसाठी सुरुवातीला महाराष्ट्रातील फक्त 44 नगरपालिकांचा समावेश होता. परंतु नंतरच्या काळात सर्वच नगरपालिकेचा समावेश करण्यात आला. यामध्ये रहिमतपूर नगरपालिकेने सहभाग घेतला तेव्हा ही योजना जवळपास 19 कोटी रुपयांची होती. तशा प्रकारचे अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात आले होते. परंतु नंतरच्या कालावधीत ही योजना वाढवण्यात येऊन अतिरिक्त दहा कोटी निधी रुपयाचा निधी वाढीव निधीसाठी शासनाकडे नगरपालिकेने पत्र व्यवहार केला.
या योजनेस मंजुरी मिळाली. परंतु योजना मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यावरून रहिमतपूरमध्ये दोन्ही गटात चांगलीच जुंपली आहे. माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी विरोधी पक्ष नेते नीलेश माने यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यांनी ही योजना आम्ही मंजूर केले असून आमच्यामुळे रहिमतपूरच्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असे सांगितले.
तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेत नीलेश माने वासुदेव माने व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. म्हैस आधी की रेडकू आधी ? असा प्रश्न विचारत या योजनेच्या मंजुरीसाठी आम्हीच पाठपुरावा केला आहे. यासाठी आत्तापर्यंत आम्ही चार ते पाच वेळा मुंबई येथे मंत्रालयात गेलो होतो. तसेच 15 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत ही योजना आम्हीच मंजूर केली, असे सुनील माने यांनी छातीठोक पण सांगितले.
त्यावर नीलेश माने यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुनील माने यांच्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लबाड बोलतात असा आरोप करत “वेळ व जागा तुम्ही सांगा त्यावेळेस चौकात पत्रकार परिषदेला समोर जाऊ’ असे जाहीर आव्हान दिले आहे. नगरपालिकेवर प्रशासक असताना प्रशासनातर्फेच या योजनेसाठी प्रस्ताव देण्यात आला. तसेच लागणाऱ्या जागा व त्यासाठी लागणारी तांत्रिक मदत याची कारवाई प्रशासनाने पूर्ण केली आहे.
त्यामुळे सुनील माने यांनी या योजनेसाठी काय केले? असा प्रश्न निलेश माने यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक शहराच्या अनेक भागात कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा होत होता. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होणे गरजेचे होते. त्यासाठी अमृत 2.0 योजना मंजूर झाली. परंतु मंजूर झाल्यानंतर दोन्ही गटाकडून सुरू असलेल्या श्रेयवादात मात्र, नागरिकांची करमणूक होत आहे.
रहिमतपूरमध्ये अनेक मोठी विकासकामे झाली. तरीही इतर शहरांच्या मानाने रहिमतपूर अजून मागास आहे. विकासासाठी सत्ताधारी योगदान देत असताना विरोधी पक्षातील नेत्यांनी चुकीच्या कामावर बोट ठेवून विरोध करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्या की दोन्ही गट एकमेकांवर टीका करून मतदारांसमोर आम्ही तुमचेच असल्याचा देखावा करत असतात. परंतु निवडणूक झाल्यानंतर पण दोन्ही गटांना शहराच्या विकासाचे काही देणे घेणे लागत नाही असे दिसते. खरे पाहता रहिमतपूरच्या विकासासाठी दोन्ही गटांनी आपापल्या ताकतीने विकासकामे खेचून आणून शहराचा विकास करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.