Rabindra Singh Bhati । देशात लोकसभा निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मात्र राजस्थानच्या एक उमेदवाराने चक्क भाजप आणि काँग्रेस पक्षालाच धडकी भरवण्याचे काम केले आहे. राज्यस्थानमध्ये एका 26 वर्षीय मुलाने 2024 ची लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलाय. या तरुणाच्या शक्तिप्रदर्शनाने सगळ्याच पक्षांना घाम फोडलाय. रवींद्र सिंह भाटी यांनी राजस्थानमधील बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. भाटी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली आणि बारमेर जिल्ह्यातील शिव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून रवींद्र सिंह भाटी यांनी निवडणूक लढविल्यामुळे ही लढत अतिशय रंजक बनलीय. भाटी यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचे टेन्शन वाढताना दिसत आहे. भाटी यांनी नुकतीच बाडमेर, जैसलमेर आणि बालोत्रा येथे जनआशीर्वाद यात्रा काढली होती, त्यादरम्यान त्यांच्या यात्रेत लाखोंचं जनसमुदाय पाहायला मिळाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करूनही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली
रवींद्र सिंह भाटी यांनी 2019 च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तिकीट मागितले होते. मात्र त्यांना तिकीट देण्यात आले. यानंतर, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. जोधपूर विद्यापीठाच्या 57 वर्षांच्या इतिहासात प्रथमच विजय मिळवला आणि स्वतंत्र विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. रवींद्र सिंह भाटी 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शिव विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होते यावेळीही त्यांनी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. यामुळे अवघ्या 9 दिवसांत त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून आमदार बनले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवली ताकद Rabindra Singh Bhati ।
4 एप्रिल रोजी भाटी यांनी लाखोंच्या जनसमुदायासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सभेला मोठी गर्दी दिसून आली. रवींद्रसिंह भाटी यांच्या मैदानात उतरल्याने भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याचे दिसतंय. अशा परिस्थितीत रवींद्र सिंह भाटी यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सोमवारपासून बारमेरमध्ये मुक्कामास आहेत. उपमुख्यमंत्री प्रेमचंद बेरवा हेही मंगळवारी बारमेरला पोहोचले. आणखी एक उपमुख्यमंत्री दिव्या कुमारीही बुधवारी बारमेरला पोहोचणार आहेत. सर्व नेते बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचे काम करत आहेत.
कोण आहेत रवींद्र सिंह भाटी? Rabindra Singh Bhati ।
रवींद्र सिंग भाटी हे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील दुधौरा या गावातले आहेत. दुधौरा हे गाव भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या शिव विधानसभा मतदारसंघात आहे. शिव विधानसभा मतदारसंघ आणि पाकिस्तानात वसलेल्या राजपूत समाजाच्या गावांमध्ये रोटी-बेटीचे नाते आहे. त्यामुळे पाकिस्तानातील त्या गावांमध्ये रवींद्रसिंह भाटी यांची चर्चा असून भाटी यांनी निवडणूक जिंकावी, अशी त्यांचीही मागणी आहे. भाटी यांनी राजस्थानी भाषेत पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. आपल्या कॉलेजच्या काळात जेव्हा त्यांना अभाविपने तिकीट दिले नव्हते तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. आता भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतही बाजी मारली. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपला धडकी भरवण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतलीय.
भाजप आणि काँग्रेस दोघांच्याही अडचणी वाढल्या
यावेळी बारमेर जैसलमेर बालोत्रा लोकसभा मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही सर्वात मोठा धोका रवींद्र सिंह भाटी यांच्याकडून असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे बडे नेते रवींद्रसिंह भाटी यांच्या विरोधात सातत्याने प्रचार करत आहेत. नुकतेच माजी मंत्री हेमाराम चौधरी यांनी मंचावरून रवींद्र सिंह भाटी यांच्यावर उघडपणे हल्लाबोल केला होता. यावेळी हेमाराम चौधरी यांच्या वक्तव्यावरून वादही निर्माण झाला होता, मात्र त्यानंतर हेमाराम चौधरी यांना जाहीर माफी मागावी लागली होती. तर दुसरीकडं भाजपच्या मूळ मतदारांमध्ये खळबळ उडालीय, त्यामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना सोमवारी बाडमेरला बोलावण्यात आले. 12 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी स्वतः रवींद्र सिंह भाटी यांच्या झालेल्या नुकसानीबाबत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पंतप्रधान मोदींची सभा
रवींद्र सिंह भाटी यांना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही १२ एप्रिलला बारमेरमध्ये येत असून येत्या काही दिवसांत बाडमेर शहरात फिल्मस्टार सनी देओल आणि भारतीय कुस्तीपटू द ग्रेट खली यांचा रोड शोही प्रस्तावित आहे. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे क्षत्रिय समाजाला आकर्षित करण्यासाठी बारमेरमध्ये निवडणूक सभा आणि रॅलीही घेऊ शकतात.