पुणे – यंदाच्या रब्बी हंगामात देशपातळीवर अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2019-20 या वर्षात गहू आणि तांदळाच्या उत्पादनात गतवर्षाच्या तुलनेत विक्रमी वाढ होईल, असा अंदाज नॅशनल कोलॅट्रल मॅनेजमेंट सर्व्हिसेस संस्थेने व्यक्त केला आहे. मक्यासह टोमॅटो, कांदे, बटाटे आदी उत्पादनांमध्येही वाढ होणार आहे. मात्र, डाळींच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार अंदाजित उत्पादन (मागील वर्षीचे उत्पादन)
यंदाच्या हंगामात एकूण 313.35 दशलक्ष टन धान्य उत्पादन होईल. (310.74 दशलक्ष टन)
109 दशलक्ष टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यात 6.27 टक्क्यांची वाढ अपेक्षित. (102.1 दशलक्ष टन)
तांदळाच्या उत्पादनात 5 टक्के वाढ अपेक्षित. रब्बीत 15 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होण्याची आशा.
डाळी आणि तेलबियांचे उत्पादन घटणार
धान्याचे उत्पादन वाढणार असले, तरी डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात होणारी घट चिंता वाढवणारी आहे. एनसीएमएलच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात डाळींच्या उत्पादनात 2, तर तेलबिया उत्पादन 2.6 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आहे.
कांदा उत्पादन वाढीने दिलासा मिळणार
दरवेळी उत्पादनात घसरण झाल्यानंतर महागाईने ग्राहकांना रडवणाऱ्या कांद्याच्या उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात 24.25 दशलक्ष टन कांदा उत्पादन होणार आहे. ज्यात 7 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर 51.94 दशलक्ष टन बटाटे उत्पादन होण्याची शक्यता आहे.