ओतूर -ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील परदेशवारी करून आलेल्या 8 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या कुटुंबातील सदस्यांना संपर्क टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकृतीत काही जाणवल्यास तात्काळ संपर्क साधण्याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादवराव शेखरे यांनी सांगितले.
ओतूर ग्रामपंचायत हद्दीत बाहेरुन आलेले सुमारे 1100 लोकांची नोंद घेण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांनी सांगितले. पुणे, मुंबईसारख्या शहरी भागातून तसेच परगावाहून गावामध्ये आलेले पाहुणे व नवीन आलेल्या लोकांची नोंद घेण्याच्या सुचनेनुसार ओतूर ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत नोंद घेऊन 1100 लोक गावात आल्याबाबतची माहिती गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना दिली असल्याचे गवारी यांनी सांगितले.
जनतेने कोरोना व्हायरसविषयी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. राज्य शासनाच्या सूचनांचे पालन न झाल्यास कारवाईला सामोरे जावेच लागणार आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्या लोकांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून केली जाणार असल्याचा इशारा ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिला आहे.