नगर -यापूर्वी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविणे शक्य झाले. त्याच धर्तीवर दर्जेदार बियाणे व दर्जेदार खते रास्त किमतीत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे हे काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व दर्जेदार खते मिळणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बांधावर खत वाटप कार्यक्रमा अंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपनीला खतांचे वाटप कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, शरद गीते, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, रवींद्र माळी, सूर्यकांत शेकडे, आर. एम. गोसावी, विजय सोमवंशी, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य उपस्थित होते.
ना. भुसे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. शेतकऱ्यांना कुठलीही खताची टंचाई येणार नाही. एका गोणी मागे शेतकऱ्याचे दहा ते वीस रुपये वाचणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांची अडवणूक आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यावेळी जगताप म्हणाले, शेतकऱ्यांनी सुद्धा जेवढे आवश्यक असेल तेवढेच खत घ्यावे असे, आवाहन यावेळी त्यांनी केले.