वाल्हे,(वार्ताहर) – यावर्षी अतिअल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पुरंदर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच मागील काही दिवसांपासून उसाचे फड पेटवून तोडण्याचा सपाटा वाल्हे परिसरात ऊसतोडणी मजूरांकडू सुरू आहे. त्यामुळे ऊस गाळपाला गेल्यावर शेतकर्यांचे प्रति टनानुसार आर्थिक नुकसान अधिक होत आहे.
मागील 20 महिन्यांपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे उसाचा सांभाळ करून अखेर शेतकर्यालाच तो जाळून टाकावा लागत आहे. पण अधिकचे नुकसान आणि कालावधी होऊन गेलेला उभा ऊस शेताबाहेर काढायचा तरी कसा? म्हणून शेतकरी आता थेट ऊसतोडणी मजुरांच्या समोरच फड पेटवून देऊ लागले आहेत. तसेच ऊस तोडून नेण्यासाठी प्रति एकरनुसार ऊसतोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. ऊस वाहतूक करणार्या चालकाला दररोज 200 रुपये भत्ता, असा दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्यांवर आली आहे.
हिवाळा संपून दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढायला सुरूवात झाली आहे. आगोदरच तीव्र पाणीटंचाई असूनही कसेबसे उसाचे पीक आणले असून सद्यःस्थितीत विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. आगोदरच उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आल्याने उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर उसाचे वजन घटत आहे. यामुळेच आगोदरच आर्थिक संकटात सापडत असलेल्या शेतकर्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा ऊस उत्पादक शेतकर्यांत होत आहे.
म्हणून फड पेटवावे लागतो
मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने, या परिसरातील डोंगर-दार्यांत असलेले साप, विंचू, खेकडे आदी या अतिवृष्टींच्या पाण्याबरोबर ओढे- नाल्यात वाहून आले. यामुळे ओढे- नाल्या लगतच्या शेतात घोणस अति विषारी साप या परिसरात ऊसतोडणी करताना अनेकांना मोठ्याप्रमाणावर अढळून आले आहेत. तसेच या परिसरातील उसाला मोठ्या प्रमाणात वाळलेले पाचट आहे; यामुळे ऊसतोड करण्या अगोदर, ऊसाचे फड पेटवावे लागत आहेत; अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर ऊसतोड मुकदमांनी दिली.
पाचट कुट्टी अभियानाचा फायदा काय?
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांच्या माध्यमातून उसाचे पाचट राखण्याचे फायदे लक्षात घेऊन याची माहिती शेतकर्यांपर्यंत प्रभावीपणे पोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ऊस पाचट व्यवस्थापन अभियान मोहिमे वाल्हे व परिसरात कृषी अधिकारीवर्ग, कृषी सहायक प्रभावीपणे राबविण्यात यशस्वी होत असून दुसरीकडे मात्र शेतकर्यांच्या उभ्या उसाच्या पिकांला जाळून तोडला जात असल्याने ऊस पाचट कुट्टी अभियान राबविण्याचा फायदा काय ? असा प्रश्न शेतकर्यांना पडत आहे.