नवी दिल्ली – मागील १३ फेब्रुवारीपासून उत्तर भारतातील, विशेषत: पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून एमएसपीबाबत कायदा करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तथापि, पंजाबमधील मुख्य पिके गहू आणि भात आहेत,
ज्यापैकी सरकारी संस्था आधीच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देऊन ९७ टक्के तांदूळ खरेदी करत आहेत तर ८० टक्के गहू देखील सरकारकडून खरेदी केला जात आहे. असे असताना वारंवार आंदोलन करुन केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यामागे केवळ राजकारणच असल्याचे बोलले जात आहे.
शेतकरी पंजाबमध्ये पिकवलेली उत्तम दर्जाचा बासमती तांदूळ ते सांगतील त्या किमतीत विकत आहेत. शिवाय हा तांदूळ मोठ्या प्रमाणावर निर्यातही केला जात आहे. म्हणजेच पंजाबचे शेतकरी आधीपासूनच एमएसपीचा फायदा घेत आहेत. त्यामुळे मेघालयानंतर पंजाबचे शेतकरी संपूर्ण देशात सर्वात श्रीमंत आहेत.
सरकारी अहवालानुसार, भारतातील ६ टक्के शेतकऱ्यांना एमएसपीचा फायदा मिळतो; ९४ टक्के लोकांना मिळत नाही. शिवाय या ६ टक्के शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरियाणातील आहेत.
पंजाबमध्ये सुमारे ९७ टक्के तांदूळ आणि सुमारे ७५ ते ८० टक्के गहू सरकारकडून खरेदी केला जातो. दुसरीकडे, बिहारमध्ये १ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये 7७ टक्क्यांपेक्षा कमी तांदूळ आणि गहू सरकारकडून खरेदी केला जातो. सुमारे ४ टक्के गहू राजस्थान सरकार खरेदी करते.
आकडेवारीनुसार, ३४४.८६ लाख मेट्रिक टन तांदूळाच्या बदल्यात, केंद्र सरकारने विविध राज्यांतील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना ६५,१११ कोटी रुपये दिले आहेत. या ३५ लाख शेतकऱ्यांपैकी पंजाबचा वाटा ५९ टक्के होता. म्हणजेच २० लाख ६५ हजार पंजाबी शेतक-यांना एमएसपीचा फायदा मिळाला आहे.
इतर पिकांनाही हमीभाव द्यावा लागेल
शेतकरी नेते सुखदेव सिंग कोकरिकलन म्हणतात की, हरियाणा आणि पंजाब सरकार मका, कापूस, सूर्यफूल आणि मूग यांसारख्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे; जेणेकरुन पाणी-केंद्रित भात पिकापासून वेगळे व्हावे आणि भात-गहू चक्र खंडित होईल. परंतु या पिकांना रास्त भाव मिळत नसल्याने शासनाच्या पीक विविधीकरणाच्या योजना यशस्वी होत नाहीत.
सरकारच्या प्रभावाखाली येऊन आपण पिके घेत; पण ती बाजारात अत्यंत कमी किमतीत विकली जातात. सूर्यफूल बियाणे किमान आधारभूत किमतीवर एमएसपीने खरेदी केले पाहिजे. त्याचा दर प्रति क्विंटल ६४०० रुपये आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात क्विंटलमागे केवळ ४ ते ५ हजार रुपये भाव मिळाला.
मक्याचे भाव घसरले
पंजाबमध्ये मक्याचे भाव सुमारे एक हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. वर्ष२०२२-२३ साठी जाहीर केलेला मक्यासाठीचा एमएसपी १९६२ रुपये प्रति क्विंटलपेक्षा खूपच कमी आहे. हरियाणातही एमएसपीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी दर घसरला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे मूगासाठी ७७५५ रुपये प्रतिक्विंटल एमएसपी जाहीर करण्यात आला होता, परंतु शेतकऱ्यांना केवळ ६००० रुपये प्रतिक्विंटल मिळत होते. किंबहुना, इतर पिकांसाठी कमी भाव असल्यामुळे शेतकरी गहू आणि तांदूळालाच प्राधान्य देताना दिसतात.
दरवर्षी, सरकार विविध पिकांसाठी एमएसपी जाहीर करते, परंतु अन्य खरेदी खासगी व्यापारी करतात. त्यांना एमएसपी किंवा त्यापेक्षा जास्त दराने खरेदी करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळे हे शेतकरी त्या पिकांनाही हमीभावाची मागणी करत आहेत. एवढेच या आंदोलनाचे फलित ठरु शकते.