पंजाब विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. कॅप्टन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरिंदर यांची निवडणुकीत कशी खेळी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंजाबमधील सत्तारूढ कॉंग्रेसमधील मतभेद विकोपाला गेल्याने काही महिन्यांपूर्वी अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले.
त्यामुळे नाराज झालेल्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ त्यांनी पंजाब लोक कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली. तो पक्ष निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक बनला. पंजाबमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. त्यामुळे स्वपक्षाबरोबरच संपूर्ण आघाडीची कामगिरी दमदार होईल यासाठी बरीचशी जबाबदारी अमरिंदर यांना स्वत:च्या खांद्यांवर घ्यावी लागली. त्या राज्यात कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
त्यामुळे अमरिंदर यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली आघाडी कशी कामगिरी करणार याविषयी उत्सुकता आहे. त्या आघाडीची कामगिरी चांगली झाल्यास कॅप्टनचा राजकीय मैदानावरील वावर कायम राहील. मात्र, आघाडीचा प्रभाव न पडल्यास वयाची एैंशी गाठलेल्या कॅप्टनची राजकीय कारकीर्दच धोक्यात येऊ शकते.